मुंबई : सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक असणाऱ्या अभिनेता प्रकाश राज यांनी केलेलं एक ट्विट त्यांना अडचणीत टाकून गेलं आहे. विविध मुद्द्यांवर परखडपणे मतप्रदर्शन करणाऱ्या राज यांच्या मतांचा चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी कायम आदर केला आहेत. पण, आता मात्र त्यांनी केलेल्या एका ट्विटची अशी काही चर्चा झाली, की त्यांना थेट ते डिलीट करण्याचं पाऊल उचलावं लागलं. याशिवाय त्यांना माफीही मागावी लागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना corona व्हायरसमुळे साऱ्या जगात भीतीचं वातावरण आहे. भारतातही या व्हायरसमुळे तणावाची परिस्थिती उदभवली आहे. यादरम्यानच राज यांनी या व्हायरसवर एक उपाय सर्वांपुढे ठेवला. ट्विट करत त्यांनी लिहिलेलं, 'एक कप कोमट पाण्याच लिंबाचा रस प्यायल्यास कोरोना व्हायरसपासून बचाव करता येऊ शकतो. एका विश्वासार्ह सूत्राकडून याविषयीची माहिती मिळाली आहे. ही माहिती मी तुम्हालाही सांगू इच्छितो. तुम्हीही इतरांपर्यंत ही माहिती पोहोचवा.'


प्रकाश राज यांनी हे ट्विट करताच त्यांची अनेकांनीच खिल्ली उडवली. काहींनी त्यांना या ट्विटसाथी खडे बोलही सुनावले. ज्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केलं. काहीतरी चांगलं सांगण्याच्या नादात मी चुकीच्या माहितीच्या आहारी गेलो, असं लिहित त्यांनी आपण चुकीच्या माहितीचा स्वीकार करत चुक सुधारत असल्याचं इतरांच्या लक्षात आणून दिलं. शिवाय चुकीची माहिती शेअर केल्याचं म्हणत त्यांनी नेटकऱ्यांची माफीही मागितली. 




वाचा : कोरोना व्हायरस : दिल्लीत उपाययोजनांसाठी बैठकांचे सत्र



चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसची भीती आता साऱ्या जगभरात पाहायला मिळत आहे. अनेक राष्ट्रांकडून या व्हारसची लागण टाळण्यासाठी काही महत्त्वाची पावलं उचलली जाऊ लागली आहेत. भारतातही कोरोनाचे काही रुग्ण आढळल्यामुळे भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. पण, घाबरून न जाता अफवांवरही विश्वास न ठेवण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.