मुंबई : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्यातील गेल्या काही दिवसांपासून शांत असलेला वाद पुन्हा एकदा पेटला आहे. हा वाद ऋतिक आणि कंगना या दोघांच्या चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेवरून निर्माण झाला आहे. कंगनाचा 'मेंटल है क्या' आणि ऋतिकचा 'सुपर ३०' चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. त्यामुळे त्याच्यात वाद सुरू झाला. परंतु आता ऋतिकने त्याच्या 'सुपर ३०' चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत माहिती देताना ऋतिकने ट्विट करत कंगनावर नाव न घेता टीका केली आहे. चित्रपटाला मीडियातील अशा ड्रामापासून तसेच स्वत:ला मानसिक त्रासापासून वाचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितलं आहे. चित्रपट तयार असूनही मी निर्मात्यांना प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचे सांगितल्याचे ऋतिकने म्हटलंय. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋतिकच्या या ट्विटला कंगनाने दुख:द कहाणी असं म्हटलंय. ऋतिकच्या ट्विटवर कंगनाची बहिण रंगोली चंडेलनेही चांगलंच सुनावलं आहे. कंगनाने मुद्दामच चित्रपटाची तारीख बदलल्याचं बोललं जात होतं. त्यावर रंगोलीने ऋतिकवर निशाणा साधत चित्रपटाची तारीख बदलली त्यात कंगनाचा काय दोष असा सवाल केला आहे. 'बालाजी काय कंगनाचं प्रोडक्शन हाऊस नाही जे ती हवं तेव्हा चित्रपट प्रदर्शित करेल. पप्पू तर पप्पू असतो. कॉमन सेन्सच नाही... आता तू पाहा तुझी काय अवस्था होते' असं ट्विट केलं आहे. 




'मेंटल है क्या' आणि 'सुपर ३०' या चित्रपटांमुळे कंगना आणि ऋतिक पुन्हा चर्चेत आले आहेत. 'मेंटल है क्या' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून 'सुपर ३०'ची तारीख २६ जुलै करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 'मेंटल है क्या' चित्रपटाच्या निर्मात्याने कंगना आणि ऋतिकचा या वादाशी कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.