COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : ‘लाखात एक आपला फौजी’असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’या ‘झी मराठी’वरील मालिकेने गेल्या एका  वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला आहे. आर्मीचं प्रशिक्षण घेण्यासाठी नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी लागतो. तेवढाच कालावधी अजिंक्यच्या जडणघडणीसाठी मालिकेमध्ये लागला आहे.


सध्या मालिकेत अजिंक्यच पोस्टिंग आसामला झालंय आणि तिथे तो मन लावून त्याचं काम करतोय. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की शीतल आणि अजिंक्य आसाममध्ये गणेशोत्सव साजरा करत आहेत. गणेशोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि त्या कार्यक्रमात शीतल आणि अजिंक्य डान्स करायचं ठरवतात. पण अजिंक्य शीतलला म्हणतो की जर कर्नल साहेब येणार असतील तरच तो डान्स करेल. अजिंक्यने एखादी गोष्ट म्हंटली आणि ती शीतलने पूर्ण केली नाही असं होणार थोडं मुश्किलच आहे.


अजिंक्यने कर्नल साहेबांसमोर परफॉर्म करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे शीतल स्वतः कर्नल साहेबांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करते आणि कर्नल साहेब कार्यक्रमाला हजेरी देखील लावतात. त्यांच्या समोर शीतल आणि अजिंक्य एक छान रोमँटिक गाण्यावर परफॉर्म करतात आणि प्रेक्षकांकडून त्यांच्या उत्तम परफॉर्मन्ससाठी दाद देखील मिळवतात. इतकंच नव्हे तर राहुल्यादेखील या कार्यक्रमात थिरकण्यापासून स्वतःला वाचवू शकत नाही आणि तो देखील प्रेक्षकांचं त्याच्या डान्स परफॉर्मन्सने मनोरंजन करतो.