मुंबई : जवळच्या नात्याचा शेवट म्हणजे काळजावर दगड ठेवून घेतलेला निर्णय. ज्यावेळी नात्यात पुढे नेण्याजोग्या काही गोष्टीच उरत नाहीत तेव्हा ते रेटण्यात काहीच अर्थ नसतो अशी भूमिका अभिनेत्री मलायका अरोराने घटस्फोटानंतर स्पष्ट केली. जवळपास 18 वर्षांच्या वैवाहिक नात्यानंतर अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांच्या नात्यात दुरावा आला. सहजीवनाचा हा प्रवास या दोघांनीही परस्पर सहमतीने इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 घटस्फोटानंतर या दोघांचंही आयुष्य बदलून गेलं. नेमकी घटस्फोटाच्या वेळी कुटुंबात किंवा एकंदरच परिस्थिती काय होती याविषयी आता खुद्द मलायकानेच माहिती दिली आहे. 


एका रेडिओ शोमध्ये अभिनेत्री करिना कपूर हिच्याशी संवाद साधत आणि तिच्या प्रश्नांना उत्तरं देत तिने याविषयीची माहिती दिली. घटस्फोट ही भारतीय समाजात एक मोठी गोष्ट मानली जाते. अशा वेळी घटस्फोट घेत असताना तुला काय सल्ले मिळाले होते? असा प्रश्न तिला विचारण्यात आला.


 या प्रश्नाचं उत्तर देत आपल्याला नेमके कोणकोणते सल्ले मिळाले याविषयी सांगितलं. घटस्फोटाच्या आदल्या रात्रीही तिच्या पालकांनी या साऱ्याचा पुन्हा विचार करण्याचा सल्ला तिला दिला होता. तू खरंच या निर्णयावर ठाम आहेस का? असाच प्रश्न तिला विचारला. आपण निर्णयावर ठाम असून, दुसऱ्या दिवशी तिने अरबाजसोबतच्या नात्यातून घटस्फोट होत वेगळी वाट निवडली. 


आज मलायका आणि अरबाज यांची वाट वेगळी झाली असली, तरी दोघे मुलाचा सांभाळ पालक म्हणून करताना दिसतात. दोघे आजही चांगले मित्र आहेत. सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत असून अरबाज खान इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे.