मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या बळावर वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत  sushant singh rajput  यानं रविवारी आत्महत्या केली. सुशांतच्या निधनाचं वृत्त हे प्रत्येकालाच धक्का देऊन गेलं. यशाच्या शिखरावर पोहोचून स्वत:ला सिद्ध करुनही सुशांतला या झगमगाटाच्या दुनियेत काही अंशी अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. पण, यात तो इतका खचला की त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला औषधांची मदत घ्यावी लागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे सुशांतच्या आत्महत्येसाठी त्याचं नैर्श्य कारण असल्याचं म्हटलं जात आहे, तर दुसरीकडे प्रस्थापितांच्या घराणेशाहीला तो बळी पडल्याचा खळबळजनक दावाही केला जात आहे. सुशांतच्या खासगी आयुष्यावरही यादरम्यान प्रकाशझोत टाकला जात आहे. या साऱ्यामध्ये नैराश्य, मनावर असणारं एखाद्या गोष्टीचं दडपण आणि त्यामुंळ खचणाऱे असंख्यजण आणि त्यांच्यापुढं असणारे अनुत्तरित प्रश्न हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. 


मानसिक संतुलनाचं महत्त्व पटवून देण्यासाठी कलाकार मंडळींनी पुढाकार घेतला. यामध्ये मराठी कलाविश्वही मागे राहिलं नाही. आपल्यातीलच एक कलागुणसंपन्न अभिनेता अशा प्रकारे त्याचं आयुष्य संपवतो हे पाहून हादरलेली ही कलाकार मंडळी मोठ्या धीरानं काही महत्त्वाचे संदेश देत आहेत. 


अभिनेता सिद्धार्थ जाधव यानंही सोशल मीडियावर एक पोस्ट करत, आयुष्याच्या अशा प्रसंगांमध्ये नेमकं आपण काय केलं पाहिजे यासाठीचं मार्गदर्शन करत आई- वडिलांचा विचार करा अशी कळकळीची विनंती केली. 
टेड टॉक्स दरम्यानचा एक व्हिडिओ शेअर करत सिद्धार्थनं लिहिलं, 'खरंतर आपलं आयुष्य खूप सुंदर आहे.. फक्त आपण त्याकडे कसं बघतो आल्यावर आपला दृष्टिकोन ठरत असतो. माझ्या आईने मला सांगितलेल्या २ गोष्टी आजही मी प्रामाणिकपणे फॉलो करतो.. आणि जमल्यास तुम्ही सुद्धा करा. कारण आयुष्यात किती ही मोठं संकट आलं तरी कुठलही चुकीचं पाऊल उचलण्याआधी एकदा आपल्या आई - बाबांचा विचार नक्कीच करा. कारण आपलं आयुष्य खूप मौल्यवान आहे.'



 


सिद्धार्थनं दिलेला हा अतिशय सोपा संदेश आणि त्याची विनंती सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून, अर्थातच अनेकांसाठी आधारही ठरत असणार यात शंका नाही.