Senate Election : मुंबई विद्यापिठातील (Mumbai University) सिनेट निवडणुका स्थगित करण्यात आल्यामुळे राजकारण तापलंय. भाजपला (BJP) निवडणुकांशिवाय सत्ता गाजवायची असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलीय. तर युवासेनेनं बोगस मतदार नोंदणी केल्यामुळेच स्थगिती दिल्याचा दावा मुंबई  भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. दुसरीकडे विद्यापीठाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसे आक्रमक
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आल्यानंतर मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे  (Amit Thackeray) यांनीही जोरदार टीका केलीय. अमित ठाकरे यांनी राज्यपालांना यासंदर्भात पत्र लिहिलंय. सिनेट निवडणूक विद्यापीठाने स्थगित करणं अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय आहे. दिल्लीतील सत्ताधीशांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्यांना लोकशाही गाडून हुकूमशाहीनेच कारभार हाकायचा आहे हे स्पष्ट आहे, अशी टीका अमित ठाकरे यांनी केलीय. या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालण्याची मागणी अमित ठाकरेंनी केलीय. 


मनसेचं राज्यपालांना पत्र
मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाची सिनेट निवडणूक (Senate Election) 'पुढील आदेश' येईपर्यंत विद्यापीठाने स्थगित करणं अत्यंत धक्कादायक आणि अशोभनीय आहे. ही निवडणूक लढवू इच्छिणारे नोंदणीकृत पदवीधर उमेदवार आज (शुक्रवार दि. १८ ऑगस्ट) सकाळी आपले उमेदवारी अर्ज विद्यापीठात दाखल करणार होते. मात्र केवळ १२ तास आधी, काल रात्री ११च्या सुमारास विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. सुनील भिरुड यांनी कालच्या शासन पत्राचा संदर्भ देऊन, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या कालच्याच बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ही निवडणूक स्थगित केल्याचं जाहीर केलं. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, नेमक्या कोणत्या कारणाने निवडणूक रद्द करण्यात आली हे नमूद करण्याची पारदर्शकता दाखवणेही विद्यापीठाच्या कुलसचिवांना गरजेचे वाटले नाही. 


आपल्याला माहितच आहे की, राजकीय- सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुशिक्षितांसाठी सिनेट निवडणूक ही व्यवस्थेत प्रवेश करण्याची पहिली पायरी असते. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसह इतरही अनेक विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी या निवडणुकीच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कारभाराबाबत तसंच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या गंभीर समस्यांबाबत काही महत्वाचे प्रश्न उपस्थित करत होते. मात्र, या पदाधिका-यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या केवळ १२ तास अगोदर ही निवडणूक स्थगित करण्यात आल्यामुळे आता एक वेगळीच शंका उमेदवार तसंच मतदार म्हणून नोंदणी केलेल्या सुमारे ९५ हजार पदवीधरांच्या मनात उपस्थित झाली आहे- "विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरत आहे?" 


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आपल्या सोयीने सातत्याने पुढे ढकलणारे राज्याचे सत्ताधारी आता सिनेट निवडणुकाही वेळेवर होऊ देणार नसतील तर त्याचा अर्थ दिल्लीतील सत्ताधीशांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्यांना लोकशाही गाडून हुकूमशाहीनेच कारभार हाकायचा आहे हे स्पष्ट आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि मुंबई विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती म्हणून आपण या अतिसंवेदनशील प्रकरणात जातीने लक्ष घालावे आणि सिनेट निवडणूक नेमक्या कोणत्या कारणाने 'रातोरात' रद्द करण्यात आली हे स्पष्ट करावे, हीच आग्रहाची मागणी. सिनेट निवडणूक रद्द करण्यासाठी आज 'पहाटे'चा मुहूर्त निश्चित केला नाही, यासाठी कुलपतींचे मन:पूर्वक आभार!


'मुख्यमंत्री डरपोक'
आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर घणाघात केलाय...राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री हे डरपोक आहेत, त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये उडी मारली...नाहीतर ईडीची कारवाई शिंदेंवर झाली असती असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केलाय...