मुंबई : रिअॅलिटी शो, नृत्यदिग्दर्शन आणि मग मालिकांमधील आघाडीती अभिनेत्री अशी आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणारी एक अभिनेत्री येत्या काळात मात्र संपूर्ण कलाविश्वातून काढता पाय घेणार आहे. लग्नबंधनात अकडल्यानंतर एका नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्रीचा निर्णय सध्या अनेकांनाच भुवया उंचावण्यास भाग पाडत आहे. ही अभिनेत्री आहे मोहिना कुमारी सिंह.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'डान्स इंडिया डान्स' या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वीच मोहिना सर्वांसमोर आली होती. एक राजकुमारी असल्याचं तिने याच कार्यक्रमादरम्यान सांगितलं होतं. रिअॅलिटी शोनंतर मोहिनाने नृत्यदिग्दर्शन क्षेत्रात करिअर केलं. ज्यानंतर तिने आपला मोर्चा अभिनयाकडे वळवला. 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेच्या माध्यमातून तिचं अभिनय कौशल्यही प्रेक्षकांना पाहता आलं. 


करिअरमध्ये एका यशस्वी वळणावर असतानाच मोहिनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच १० फेब्रुवारीला मोहिनाचा साखरपुडा झाला. सुयश रावत याच्याशी काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ती यंदाच्याच वर्षी विवाहबंधनात अडकणार आहे. ज्यानंतर ती देहरादून येथे वास्तव्यास जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 



खासगी आयुष्याला प्राधान्य देत मोहिनाने मालिकेतून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय लग्नानंतर ती अभिनय विश्वालाही रामराम ठोकणार आहे. याविषयीच 'बॉम्बे टाईम्स'शी संवाद साधताना मोहिना म्हणाली, 'लग्नानंतर मी अभिनय विश्वाला आणि मुंबईला रामराम ठोकणार आहे. माझं आयुष्य आता १८० अंशात घेण्यासाठी सज्ज आहे. मी उत्सुक आहे, पण मनावर यावेळी एक प्रकारचं दडपणही आहे. माझ्या काही कलाकार मित्रांनाही या निर्णयाचा धक्का बसला आहे. पण, मी ही अशी आहे. अंतर्मनाचा आवाज ऐकण्यालाच मी प्राधान्य देते', असं मोहिना म्हणाली. त्यामुळे आता एका नव्या भूमिकेसाठी मोहिनाला चाहत्यांकडून आणि या कलाविश्वातूनही शुभेच्छा देण्यात येत आहेत.