मुंबई : असं म्हणतात की प्रेम हे आंधळं असतं आणि लग्नानंतर डोळे उघडतात तसंच काहीसं झी मराठी वरील 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेतील समीर आणि मीरा बाबतीतही होतं. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस प्रेम आणि आनंदात पार पडतात पण त्याचा गोडवा ओसरला की मग सुरु होते संसाराची तारेवरची कसरत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाआधी एकमेकांच्या अवगुणांवर पडदा टाकणारे हे दोघे लग्नानंतर कोणताही आडपडदा न ठेवता एकमेकांच्या चुका काढायला लागतात आणि भांडायलाही लागतात आणि बघता बघता हे भांडण एवढ्या टोकावर जातं की ते दोघे वेगळे होतात. आजच्या परिस्थितीशी मिळतीजुळती असलेल्या या मालिकेने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. प्रेक्षकांचे प्रेम आणि अखंड पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकतेच २०० भाग पूर्ण केले. या मालिकेत प्रेक्षकांना नेहमीच ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळतात. समीर आणि मीरा हे जणूकाही आजच्या तरुण विवाहित जोडप्याचं प्रतिनिधित्वच छोट्या पडद्यावर करत आहेत असं वाटतं.


रोहिणी हट्टंगडी यांनी साकारलेली आजी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आणि ही प्रेमळ पण वेळप्रसंगी एकेकाला अद्दल घडवणारी आजी प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवते. या मालिकेचे हे यश सर्व टीमने सेटवर केक कापून साजरं केलं. यावेळी कलाकारांनी संपूर्ण टीमचे कौतुक केले आणि २०० एपिसोड्सचा यशस्वी टप्पा गाठल्याचा आनंद एकत्र साजरा केला.