Antibiotics use in India : भारतात सध्याच्या घडीला अँटिबायोटिक्स (Antibiotics) घेण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. सर्दी, खोकला, ताप थंडी अशा छोट्या मोठ्या आजारांवरही इन्स्टंट उपाय म्हणून अनेकजण सर्रासपणे अँटीबायोटिक्सचं सेवन करतात. जरासं काही दुखलं-खुपलं तर डॉक्टरकडे (Doctor) न जाता केमिस्टच्या (Chemist) सल्ल्यानंच अँटीबायोटिक्स घेतले जातात. मात्र याचे दुष्परिणाम लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अँटीबायोटीक्सच्या अतिसेवनामुळे भविष्यात ही औषधच निष्क्रिय होऊ शकतात. तसंच त्याची मात्राही लागू पडू शकत नाही अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलीये. यासंबंधात अलिकडेच जगप्रसिद्ध लॅन्सेट या नियतकालिकाने या विषयावरील शोधनिबंध प्रसिद्ध केलाय. त्यात वारंवार अँटीबायोटिक्स घेण्याच्या भारतीयांच्या सवयीवर चिंता व्यक्त करण्यात आलीय. 


लॅन्सेटच्या अहवालानुसार, गरज नसताना वारंवार अँटीबायोटिक्स घेतल्यामुळे त्याचा मानवी शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो. अँटीबायोटिक्स घेणाऱ्या व्यक्तीला गंभीर आजार झाल्यास त्यावेळी ते औषध परिणाम करत नाही. तसंच भारतात अँटीबायोटिक्सच्या वापरावर कसलंही नियंत्रण नसल्याची बाब या संशोधनामध्ये समोर आलीय. 


देशात सध्या वापरात असलेल्या 44 टक्के अँटीबायोटिक्सना सेंट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनची परवानगीच मिळाली नसल्याची धक्कादायक बाबही लॅन्सेटनं समोर आणलीये. याचाच अर्थ भारतात केवळ 46 टक्के औषधांनाच CDSCO ची परवानगी आहे.


त्यामुळे आता यापुढे किरकोळ आजारांसाठी वारंवार मेडिकलची वाट धरून स्वत:च्या शरीरावर अँटीबायोटीक्सचा मारा करू नका. ही चूक भविष्यात तुमच्या जिवावरही उठू शकते.