दिल्ली : जर रणनीती वेळीच अंमलात आणली असती तर कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचे प्राण वाचले असते. परिस्थितीच्या गंभीरतेचा अंदाज न आल्याने सरकारला फटकारत एका संसदीय समितीने म्हटलंय. आरोग्यविषयक संसदीय स्थायी समितीने राज्यसभेत मांडलेल्या आपल्या 137 व्या अहवालात म्हटलंय की, दुसऱ्या लाटेमध्ये अधिक प्रकरणं, वाढते मृत्यू, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि बेडची कमतरता, औषधांचा पुरवठा आणि इतर अत्यावश्यक औषधांची कमतरता आहे. अत्यावश्यक आरोग्य सेवा, ऑक्सिजन सिलिंडर आणि औषधे इत्यादींचा साठा आणि काळाबाजार हे त्यामागील प्रमुख कारण होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीटीआयच्या म्हणण्यानुसार, संसदीय समितीने आपल्या अहवालात म्हटलंय की, "समितीचं मत आहे की, जर लोकसंख्येमध्ये व्हायरसचा लवकरात लवकर शोध घेण्यास सरकारला यश आलं आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी धोरण योग्यरित्या अंमलात आणलं गेलं तर त्याचे परिणाम दिसून आले असते. त्यामुळे परिणाम कमी गंभीर झाले असते आणि अनेक जीव वाचू शकले असते."


या समितीला असंही आढळून आलंय की, भारत हा जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांपैकी एक आहे. देशाच्या लोकसंख्येने साथीच्या रोगाचा सामना करताना एक मोठं आव्हान उभं केलं आहे. 


समितीने नमूद केलंय की, आरोग्य पायाभूत सुविधा आणि आरोग्य कर्मचार्‍यांची तीव्र कमतरता यामुळे देशावर प्रचंड दबाव आहे. शिवाय असंही नमूद करण्यात आलंय की, सरकार कोरोनाच्या तीव्रतेचा अंदाज लावू शकले नाही.