मुंबई : देशात कोरोनाने थैमान घातलं असून सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी बहुतांश लोकं इम्युनिटी वाढवण्यावर भर देताना दिसतायत. इम्युनिटी वाढवण्याच्या प्रक्रियेत मोठी भूमिका आहे ती म्हणजे काढ्याची. दरम्यान या काढ्यासंदर्भात सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. इम्युनिटी वाढवण्यासाठी तसंच कोरोनावर उपचार म्हणून या काढ्याचा वापर केला जाऊ शकतो असं या दाव्यांमध्ये म्हटलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच एक ऑडियो क्लिपही व्हायरल करण्यात झाली होती. यामध्ये घरगुती बनवलेल्या काढ्याच्या मदतीने कोरोनाला हरवलं जाऊ शकतं, असा उल्लेख करण्यात आला होता. दरम्यान या दाव्यांमध्ये किती सत्यता होती आणि याबाबत सरकारकडून पीआयबीच्या फॅक्टचेकमध्ये काय माहिती समोर आली हे पाहूयात.


व्हॉट्सअॅपच्या व्हायरल व्हीडिओमध्ये करण्यात आलेला दावा


या व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये काढ्याच्या रेसिपी सांगण्यात आली आहे. या काढ्यामध्ये वेलची, दालचिनी, काळी मिरी, ओवा, हळद आणि लवंगीची गरज असल्याचं सांगण्यात आलं. यामध्ये जो व्यक्ती आहे तो स्वत: डॉक्टर असल्याचं म्हणतोय. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, कोणीही या काढ्याचं सेवन केल्यानंतर 24 तासांच्या आत कोरोना व्हायरस आणि त्याची लक्षणं संपूर्णपणे निघून जातील. मात्र पीआयबीने या व्हीडियोची सत्यता समोर आणली आहे.


पीआयबीकडून त्यांच्या खुलास्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, या व्हायरल ऑडियोमध्ये जो दावा करण्यात आला आहे तो पीआयबीच्या फॅक्टचेकमध्ये भ्रामक असल्याचं समोर आलंय. त्यामुळे या ऑडियोला पुढे फॉरवर्ड करू नका. या प्रकराच्या काढ्याच्या सेवनाने केवळ इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे अशा गोष्टींचं सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचीही सुचना केली आहे.