जयपूर : राजस्थानात भरतपूरमध्ये एका एटीएममधून पैसे काढताना बँकेचे ग्राहक फारच खूश झालेत. कारण, या एटीएममधून १०० च्या ऐवजी ५०० च्या नोटा निघाल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मग काय ही बातमी थोड्या वेळातच परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांनी आपल्या डेबिट कार्डासहीत एटीएमवर एकच गर्दी केली. १०० रुपयांचं बटन दाबायचं पण हातात ५०० च्या नोटा पडत होत्या... पाच पटीनं पैसे मिळाल्यानं ग्राहकांचा आनंदही गगनाला भिडत होता. 


काही वेळातच जवळपास २५० लोकांनी जवळपास २ लाख रुपये काढले. ही गोष्ट जेव्हा बँकेच्या लक्षात आली... तेव्हा खूप उशीर झाला होता.


यामुळे, बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी मात्र वाढल्यात. त्यामुळे बँक कर्मचारी ग्राहकांच्या घरचा पत्ता शोधत त्यांना पैसे परत करण्याची विनंती करताना दिसत आहेत. परंतु, अनेक ग्राहकांनी पैसे परत देण्यास नकार दिलाय. वेगवेगळ्या बँकेचे ग्राहक असल्यानं एक्सिस बँकेला ग्राहकांची माहिती मिळवण्यासाठीही मोठी कसरत करावी लागतेय. 


एटीएममध्ये १०० रुपयांच्या पैशांच्या ट्रेमध्ये ५०० रुपयांच्या नोटा टाकण्यात आल्या होत्या, त्यामुळे ही घटना घडलीय. २४ जुलै रोजी ही घटना उघडकीस आली.