लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठा टर्निग पॉइंट असतो. याचं कारण यानंतर आयुष्याला एक वेगळं वळण मिळतं. लग्न लावताना सर्व विधी पार पाडत रितसर पद्धतीने होणं गरजेचं असतं. पण काहींना मात्र लग्नात इतकी घाई असते की कधी एकदा विधी पार पडतात याची वाट पाहत असतात. पण याच हट्टापायी त्यांच्या हातून काहीतरी चुकीचं घडतं. ज्याचा पश्चाताप कदाचित पुढे आयुष्यभर त्यांना करावा लागतो. उत्तर प्रदेशात असंच एक अजब प्रकरण समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्न लावण्यासाठी उशीर होत असल्याने एका नवरदेवाने मंडपातच मारहाण करण्यास सुरुवात केली. धक्कादायक म्हणजे त्याने थेट लग्न लावणाऱ्या भटजीवरच हात उचलला. या मारहाणीत पंडित गंभीर जखमी झाला आहे. यानंतर पंडितने थेट पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांना याची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेनंतर लग्न मंडपात मात्र एकच धावपळ सुरु झाली होती. 


मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊच्या निगोहा गावात हा सगळा प्रकार घडला आहे. मेरठचा रहिवासी असणारा सोनू सिंह जाटव पोलीस ठाण्यात शिपाई पदावर आहे. निगोहा गावातील तरुणीशी त्याचं लग्न ठरलं होतं. क्लासिक रेस्तराँमध्ये लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. पंडित विवेक शुक्ला हे लग्न लावत होते. 


रात्री 1 वाजता लग्नाचे विधी सुरु झाले होते. यावेळी  नवरदेवाने भटजीला लवकर लग्न लावण्यास सांगितलं. यावर भटजीने आपण घाई करु शकत नाही असं स्पष्ट सांगितलं. कारण लग्नात सप्तपदी घेताना अनेक नियम आणि मंत्रोच्चार असतात. यावर सोनू आणि विवेक यांच्यात जोरदार भांडण झालं. सोनूने तर विवेक यांना शिवीगाळच सुरु केला. 


विरोध केला असता सोनूने पंडित विवेक यांना मारहण केली. यामुळे विवेक यांचं डोकं फुटलं. विवेक यांचा भाऊ सचिन शुक्ला मध्यस्थी करण्यासाठी पुढे आला असता सोनूने त्यालाही मारहाण केली. यानंतर त्यांना छेडछाडीच्या गुन्ह्यात अडकवून आत पाठवेन अशी धमकी दिली. 


पंडितने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई आम्ही करत आहोत अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. 


या मारहाणीमागे त्यांच्यातील जुना वाद कारणीभूत असल्याचं काहीजण म्हणत आहेत. पण सत्यता काय आहे हे पोलीस तपासानंतरच पुढे येईल. दरम्यान यावेळी नवरदेवाने सप्तपदी न घेताच नवरीमुलीला घेऊन गेला असं सांगण्यात येत आहे.