ग्वाल्हेर : जवळपास १५ वर्षांपासून बेपत्ता असणाऱ्या एका सहकारी पोलीस अधिकाऱ्याला शोध सेवेत असणाऱ्या, त्यांच्याच तुकडीतील दोघांना लागला आहे. मानसिक स्वास्थ्य ढासळलेला, थंडीने कुडकुडणाऱ्या अवस्थेत ते सापडले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीएसपी रत्नेश सिंह तोमर आणि विजय सिंह बहादूर मंगळवारी रात्रीच्या सुमारास शहरातून आपल्या वाहनानं जात होते. त्याचवेळी त्यांना भिकाऱ्याप्रमाणं एक माणूस दिसला. थंडीमुळं थरथर कापत असताना तो माणून उरलंसुरलं अन्नं शोधत होता. 
हे पाहताच त्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचं वाहन रस्त्याच्या बाजूला उभं केलं. त्यापैकी एका अधिकाऱ्यानं या व्यक्तीला थंडीपासून बचावासाठी उबदार जॅकेट दिलं.


दोन्ही अधिकाऱ्यांना धक्का तेव्हा बसला, जेव्हा या व्यक्तीनं त्यांना त्यांच्या पहिल्या नावानं हाक मारली. आपल्याला या व्यक्तीनं हाक मारताच त्या दोघांच्याही एक अत्यंत महत्त्वाची बाब लक्षात आली. की, ही व्यक्ती दुसरीतिसरी कोणी नसून आपल्याच तुकडीतील मनिष मिश्रा नामक सहकारी आहेत. २००५ पासून ते बेपत्ताच होते. त्यावेळी ते दातिया येथे पोलीस इन्सपेक्टर पदावर सेवेत होते. 


दरम्यानच्या वर्षांमध्ये ते नेमके कुठं होते, याबाबत कोणालाही काहीही कल्पना नव्हती अशी माहिती ग्वाल्हेरच्या क्राईम ब्रांचमध्ये कार्य़रत असणाऱ्या तोमर यांनी दिली. ओळख पटल्यानंतर या दोन्ही अधिकाऱ्यांनी सहकाऱ्याला पुढील व्यवस्था होईपर्यंत एका स्वयंसेवी संस्थेत निवाऱ्यासाठी नेलं. 


'मिश्रा हे उत्तम दर्जाचे खेळाडू आणि शार्प -शूटर होते. १९९९ मध्ये आमच्यासोबतच ते पोलीस सेवेत रुजू झाले होते. काही वर्षांनी त्यांना मानसिक आजार जाणवू लागले. कुटुंबीयांनी त्यांच्यावर उपचारही केले. पण, एके दिवशी ते बेपत्ता झाले', असं तोमर म्हणाले. 



 


आता, मिश्रा यांची संपूर्ण काळजी घेऊन आपल्या मित्राच्या दैनंदिन जगण्याची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठीच हे पोलीस अधिकारी प्रयत्नशील असतील.