Arvind Kejriwal Health News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) मद्य धोऱण कथित घोटाळा प्रकरणी तिहार जेलमध्ये बंद आहेत. यादरम्यान आम आदमी पक्षाकडून वारंवार त्यांच्या प्रकृतीचा दाखल देत प्रशासनावर गंभीर आरोप केले जात आहेत. यादरम्यान तिहार जेलने अरविंद केजरीवाल यांचा वैद्यकीय अहवाल सादर केला असून, यावर आम आदमी पक्षाने प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद केजरीवाल यांची शुगर लेव्हल अनेकदा कमी झाल्याचं तुरुंग प्रशासनाने मान्य केल्याचं आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग (Sanjay Singh) म्हणाले आहेत. शुगर लेव्हल कमी झाल्यास ते झोपेत कोमात जाऊ शकतात. तसंच शुगर लेव्हल कमी झाल्यास ब्रेन स्ट्रोकचाही धोका आहे असं संजय सिंग म्हणाले आहेत. तिहार जेलनेही अरविंद केजरीवाल यांचं वजन कमी झाल्याचं सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वजनाबाबत आप नेते आणि दिल्ली सरकारच्या मंत्र्यांच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अरविंद केजरीवाल यांचे 8.5 किलो वजन कमी झाल्याचा दावा आप सरकारचे मंत्री, खासदार आणि इतर सातत्याने करत आहेत. यानंतर तिहार जेलच्या अधीक्षकांनी अरविंद केजरीवाल यांच्या वजनाबाबत सुरू असलेल्या दाव्यावर दिल्ली सरकारच्या गृह विभागाला पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी केजरीवालांचं वजन कमी झाल्याचं मान्य केलं आहे. 


तुरुंग अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, अरविंद केजरीवाल 1 एप्रिल 2024 रोजी पहिल्यांदा तिहार तुरुंगात आले तेव्हा त्यांचं वजन 65 किलो होतं. अरविंद केजरीवाल यांनी 10 मे रोजी तिहार सोडलं तेव्हा त्यांचं वजन 64 किलो होते. 2 जून रोजी त्यांनी तुरुंगात आत्मसमर्पण केलं तेव्हा त्यांचं वजन 63.5 किलो होते. सध्या त्याचे वजन 61.5 (14 जुलै) किलो आहे.


कमी अन्न खाल्ल्याने किंवा कमी कॅलरी घेतल्यानेही वजन कमी होऊ शकतं, अशी माहितीही कारागृह अधीक्षकांनी दिली आहे. वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अरविंद केजरीवाल यांची दररोज तपासणी केली जाते. याशिवाय न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल याही वैद्यकीय मंडळाशी सल्लामसलत करताना उपस्थित असतात.


दिल्ली सरकारचे काही मंत्री, एक विद्यमान खासदार आणि आम आदमी पक्षाच्या इतर आमदारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे बिनबुडाचे आरोप केले आहेत, असं या पत्रात लिहिले आहे. तुरुंग प्रशासनाला घाबरवण्याच्या उद्देशाने खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे असा दावा त्यांनी केला आहे.