नवी दिल्ली : ७१व्या स्वातंत्र्यदिनी राजधानी दिल्लीत लाल किल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा देशाला झालेला फायदा सांगितला. मोदी म्हणाले नोटबंदीमुळे बॅंकांकडे मोठ्या प्रमाणात पैसा आला. ज्यामुळे कर्जांवरील व्याजदर घटले आणि कर्जे स्वस्त झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटबंदीमुळे सर्वसामान्या नागरिकाला स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मोठी मदत झाली. केवळ श्रीमंतच नव्हे तर, गरीब, मध्यमवर्गीय लोकांच्याही आकांक्षा पूर्ण होतील. अनेकांना आपल्या हक्काचे घर घेण्यास मदत होईल. ज्या व्यक्तीला आपले स्वत:चे घर घ्यायचे किंवा बांधायचे असेल अशा मंडळींना बॅंका स्वत:हून मदत करतील. या बॅंका या लोकांना अत्यंत कमी व्याजदरात कर्ज देतील. हा बदल देशाची अर्थव्यवस्था बदलण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचेही मोदी म्हणाले.


सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीय परिवारांसाठी स्वस्त दरात गृहकर्ज उपलब्ध करून देणारी योजना सुरू केली आहे, असे सांगतानाच २०२२ मध्ये 'भव्य दिव्य भारत' उभारण्याचे स्वप्नही मोदींनी देशवासीयांसमोर ठेवले. मोदी म्हणाले आपण सगळे खांद्याला खांदा लाऊन असा भारत निर्माण करू की, लोकांकडे स्वत:चे पक्के घर असेन. ज्यात वीज, पाणी या समस्या नसतील. देशातील शेतकरी सुखाने झोप घेऊ शकेल. तसेच, आज शेतकरी जे कमावत आहे त्याच्या दुप्पट २०२२ मध्ये कमावेन असेही मोदी म्हणाले.