नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या COVID-19 pandemic पार्श्वभूमीवर सरकारकडून अतिशय कमी लोकांना अमरनाथ यात्रेसाठी Amarnath परवानगी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र पुढील आठवड्यात अमरनाथ यात्रेबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरमधील Jammu and Kashmir अमरनाथ मंदिर आणि वैष्णोदेवी मंदिर Vaishno Devi येथे भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्याबाबत उच्चस्तरीय समितीत चर्चा झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या समितीत केंद्रीय गृह राज्यमंत्री किशन रेड्डी, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि गृह मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर प्रशासनातील उच्च अधिकारी उपस्थित होते. 21 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीत, अमरनाथ यात्रेसाठी एका दिवसांत 500 हून अधिक भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्यात येणार नसल्याची चर्चा करण्यात आली. याबाबतचा अंतिम निर्णय पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. 


वैष्णोदेवी मंदिरात भाविकांना दर्शनासाठी 31 जुलैपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. वैष्णोदेवी मंदिर सर्वप्रथम स्थानिक भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचीही चर्चा बैठकीत करण्यात आली. स्थानिक भाविकांना मंदिर खुलं करण्यात आल्यानंतर, परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, त्यानंतरच इतर राज्यांतील लोकांना मंदिरात दर्शनासाठी परवानगी दिली जाईल. 


दरम्यान, अमरनाथ यात्रेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु जम्मू-काश्मीर सरकारने यासाठीची तयारी सुरु केली आहे. पहलगाम मार्गावर बर्फ असल्यामुळे यावर्षी केवळ बालटाल मार्गावरुनच यात्रा होण्याची शक्यता आहे. भाविकांना जम्मूहून बालटाल येथे पोहोचण्याचं काम राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस करणार असून भाविकांच्या बसेस कडक सुरक्षेत बालटाल येथे रवाना करणार असल्याची माहिती आहे. यासाठी बसेसच्या सॅनिटायझेशनचं काम पूर्ण करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.