नवी दिल्ली : डोकलाम वाद निवळल्यावर सद्यातरी भारत-चीन सीमेवर शांतता आहे. असे असले तरी, भारताला चीन आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांसोबत एकाच वेळी युद्ध लढावे लागू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी याबाबत इशारा दिला आहे. येत्या काळात भारताला दोन्ही आघाड्यांवर लढावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. उत्तरेला असलेला चीन आणि पश्चिमेला असलेल्या पाकिस्तानकडून आपल्याला युद्धाचा धोका आहे. डोकलाम वाद निवळून एक आठवडा उलटत आहे. तोवरच रावत यांनी हा इशारा दिल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. उत्तरेकडे चीनने आपली ताकद दाखवणे सुरू केले आहे. 'सलामी स्लाइसिंग' म्हणजेच  भूभागावर हळूहळू कब्जा करणे तसेच, सतत दुसऱ्याच्या ताकतीचा अंदाज घेत राहणे, ही चीनची वृत्ती चिंतेचा विषय आहे. त्यामुळे भारताला सतत सतर्क रहावे लागणार असल्याचेही रावत यांनी म्हटले आहे.


पुढे बोलताना रावत यांनी म्हटले आहे की, भारत-चीन ताणलेल्या संबंधाचा पुढे जाऊन पाकिस्तानही फायदा उठवण्याचा प्रयत्न करू शकतो. महत्त्वाचे असे की, लष्करप्रमुखांनी हा इशारा पहिल्यांदाच  दिला नाही. यापूर्वीही त्यांनी हा इशारा दिला आहे. लष्करप्रमुखांचा इशारा हेच सांगत आहे की, भारत चीनच्या आगळीकीवर किती संवेदनशील आहे.