नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच अरुणाचल प्रदेशमध्ये मात्र एका आमदारासहीत ७ सहकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. नागा दहशतवाद्यांच्या 'नॅशनल सोशलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँड' (एनएससीएन) या फुटीरतावादी गटानं ही हत्या केल्याचं सांगितलं जातंय. एनएनपी पक्षाचे आमदार तिरोंग अबो यांना या घटनेत जीव गमवावा लागलाय. यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित असलेले सहा कुटुंबीयही मृत्यूमुखी पडलेत. तिरोंग अबो हे अरुणाचल प्रदेशच्या खोंसा-पश्चिम मतदारसंघाचे आमदार होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


तिरप जिल्ह्यातील खोनसा भागातील बोगापानी गावात दुपारी ११ वाजल्याच्या दरम्यान भररस्त्यात या हत्या करण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार तिरोंग आबो आणि इतरांवर क्रूर हल्ला करण्यात आला. यात अबो यांचे पीएसओही (सुरक्षा अधिकारी) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.


 


घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी आणि सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले. दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी या भागात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलंय. 



मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी या क्रूर हल्ल्याची निंदा केलीय. तसंच गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केलीय. केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजीजू यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केलाय. 'अरुणाचलचे आमदार तिरोंग अबो आणि त्यांच्या कुटुंबीयांसमवेत इतरांच्या हत्येनं दु:खी आहे. हल्ला करणाऱ्यांवरिद्ध कठोर कारवाई केली जाईल' असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.