नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि १४ फेब्रुवारीचं अनोखं कनेक्शन आहे. २०१३ आणि २०१५ दोन्ही वेळेस दिल्ली विधानसभा निवडणुकीत व्हॅलेण्टाईन डे आणि अरविंद केजरीवालांचं कनेक्शन राहिलं आहे. २८ डिसेंबर २०१३ रोजी केजरीवालांनी काँग्रेसच्या साथीनं पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र केवळ ४९ दिवसांतच हे सरकार गडगडलं. केजरीवालांनी १४ फेब्रुवारी २०१४ रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१५ मध्ये आपनं दिल्लीत घवघवीत यश संपादन केलं. ७० पैकी ६७ जागा मिळवत केजरीवालांनी सरकार स्थापन केलं. यावेळी त्यांनी शपथविधीसाठी १४ फेब्रुवारीचाच दिवस निवडला. आता २०२० मध्ये देखील आपची सत्ता येते आहे. त्यामुळे आता देखील केजरीवाल शपथविधीसाठी १४ फेब्रुवारीचा मुहूर्त निवडणार का? याची उत्सुकता आहे.


दिल्लीकरांनी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास दाखवला आहे. आपच्या कार्यालयात फुलांनी सजावट करण्यात आली असून रस्त्यावर आपचे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत. पेढे, लाडू वाटून आपचे कार्यकर्ते हा विजय साजरा करत आहेत. राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा आपचीच सत्ता येत आहे. एक्झिट पोलमध्ये ही आपला बहुमत मिळेल असं सांगण्यात आलं होतं.


जनतेचे प्रश्न आणि विकास या मुद्यावरच केजरीवालांनी निवडणूक लढवली. आम आदमी पार्टीने पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे.