Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाच्या (Ramlalla) मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. मंदिरात अपेक्षेपेक्षाही जास्त गर्दी होत असल्याने राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र व्यवस्थापनाची दमछाक होताना दिसत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनाने तिरुपती बालाजी मंदिराचा (Tirupati Balaji Mandir) अभ्यास करण्याचं ठरवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिरुपती बालाजी मंदिरात दिवसाला 60 हजारांपेक्षा जास्त भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. संपूर्ण वर्षभर मंदिरात इतकीच गर्दी असते. पण इतकी गर्दी असतानाही मंदिराने त्याचं अत्यंत योग्य व्यवस्थापन केलं आहे. यामुळे कितीही गर्दी असली तरी भाविकांना अत्यंत योग्य प्रकारे दर्शन मिळतं. 


तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी आहे. भारतातील हिंदू मंदिरांची तुलना करता येथे सर्वात जास्त भाविक दर्शनासाठी येतात. श्री बालाजी किंवा श्री वेंकटेश्वराला प्रभू श्रीरामाप्रमाणे विष्णूचा अवतार मानण्यात आलं आहे. तिरुमला मंदिराव्यतीरिक्त तिरुमला तिरुपती देवस्थान देशभरातील इतर 5 डझनपेक्षा अधिक मंदिरांचा कार्यभाळ सांभाळतं. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच अयोध्येतील एक टीम तिरुमला तिरुपती देवस्थानच्या गर्दी व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी तिरुमलाला जाणार आहे. 


प्रतिष्ठापनेच्या दिवशी अयोध्या ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानचे चेअरमन भुमान करुणाकर रेड्डी यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी तिरुमलाला भेट देत त्यांच्या काही चांगल्या पद्धतींचा अवलंब करण्याची इच्छा व्यक्त केली. रेड्डी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांना मंदिराला भेट देण्यासाठी आमंत्रित केलं आहे. तसंच त्यांना सर्व मदत केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. 


तिरुपती मंदिरात वर्षाला 2.4 कोटी भाविक भेट देतात. दिवसाला जवळपास 60 हजार भाविक दर्शासाठी येतात. मात्र सणांच्या आणि सुट्टींच्या दिवशी ही संख्या 1 लाखापेक्षा अधिक असते. पण इतकी गर्दी असतानाही तिरुमला तिरुपती देवस्थानाने भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी उत्तम व्यवस्था उभारली आहे. दर्शनासाठी रांग, लाडूचे सेंटर, अन्नप्रसादम अशा अनेक चांगल्या व्यवस्था मंदिराकडून देण्यात आल्या आहेत.