Bihar Crime News: मोबाईल (Mobile) आणि त्याच्या अती वापरामुळे पती पत्नीमध्ये वाद होणं ही तशी सामान्य बाब म्हणावी लागेल. मात्र याच वादातून एका महिलेने थेट नवऱ्यालाच सोडून दिल्याचा अजब प्रकार बिहारमध्ये घडला आहे. येथील हाजीपूरमध्ये (Hazipur) नवविवाहित महिला लग्नाच्या 15 दिवसांच्या आतच घर सोडून माहेरी निघून गेली. पती आपल्याला मोबाईल वापरु देत नाही अशी या महिलेची तक्रार होती. वारंवार पती हटकत असल्याने चिडलेल्या माहिलेने थेट माहेरच्या लोकांना बोलावून घेतलं. या महिलेच्या भावाने तर भावोजीवर छातीवर थेट बंदूकच ठेवली. त्यानंतर हे प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेलं. या माहिलेच्या भावाला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडील बंदूक पोलिसांनी ताब्यात घेतली. यानंतर ही महिलाही नवऱ्याला आणि त्याच्या घरच्यांना सोडून माहेरी परतली.


नेमकं प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार हाजीपूरमधील लालगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या इलियास नावाच्या तरुणाचं लग्न हाजीपूरमधील सबा खातून नावाच्या मुलीशी झालं होतं. अगदी थाटामाटात दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. लग्न करुन सासरी आल्यानंतर सबा सतत मोबाईल वापरायची अशी इलियासची तक्रार होती. सबाच्या या मोबाईलच्या सवयीवरुन तिला इलियासबरोबर त्याच्या घरच्यांनीही अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना फारसं यश आलं आहे. सबा सकाळपासून अगदी रात्री झोपेपर्यंत मोबाईलवरच असायची. सबाला सोशल मीडियाचं व्यसन असल्याचं इलियासच्या घरच्यांचा दावा आहे. फेसबुक आणि इन्स्ताग्रामच्या नादात सबा घरातील कामांकडेही लक्ष देत नसल्याची इलियासच्या घरच्यांची तक्रार होती. यासंदर्भात इलियासनेच सबाला मोबाईलवरुन सुनावलं. त्यानंतर तिचे सासू-सासरेही तिला मोबाईलच्या अतीवापरावरुन बोलले. त्यामुळे साबाने थेट आईला फोन करुन रडत रडतच सारा घटनाक्रम सांगितलं. सबाचं रडणं ऐकून तिची आई, भाऊ आणि काही नातेवाईक थेट तिच्या सासरी पोहोचले.


थेट छातीवर ठेवली बंदूक


सबाच्या नातेवाईकांनी तिची बाजू घेऊन तिच्या सासरच्या लोकांबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. मात्र बाचाबाची वाढत गेली आणि सबाच्या भावाने तिच्या पतीच्या छातीवर थेट बंदूक ठेवल्यानंतर प्रकरण आणखीनच तापलं. बंदूक छातीवर ठेवून वाद सुरु असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र एवढा तमाशा झाल्यानंतरही सबाने पतीऐवजी मोबाईलची निवड केली आणि घर सोडण्याचा निर्णय घेतला. ती आपल्या नातेवाईकांबरोबर माहेरी निघून गेली.


दोन्ही पक्षांचा एकमेकांवर आरोप


मुलीचं लग्न झाल्यानंतर दोन आठवड्यांच्या आतच सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरु केल्याचा आरोप सबाच्या आईने केला आहे. सबाचा मोबाईल सासरच्या व्यक्तींनी ताब्यात घेतला. तिला आमच्याशी बोलून दिलं जात नव्हतं. सबाचा फोन बंद असल्याने तिच्या सासूच्या आणि जावयाच्या क्रमांकावर फोन केला त्यांनी वाईट भाषेत माझ्याशी संवाद साधला असाही आरोप साबाच्या आईने केला आहे. तर इलियासच्या आईने हे सर्व आरोप फेटाळून लावत केवळ मोबाईल वापरण्याच्या मुद्द्यावरुन वाद पोलीस स्टेशनपर्यंत गेल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.