नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या हंदवाडा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफ इंस्पेक्टर पिंटू सिंह शहीद झाले. रविवारी त्यांचे पार्थिव पटना येथे आणण्यात आले. सकाळी 8 वाजून 15 मिनिटांनी त्यांचे पार्थिव पटना येथील विमानतळावर दाखल झाले. पण यावेळी सत्ताधारी पक्षाचा कोणताही नेता त्यांच्या पार्थिवावर फुले चढवण्यासही उपस्थित नव्हता. पटना विमानतळावर शहीद पिंटू सिंह यांना एसएसपी गरिमा मलिक यांच्या सहीत सीआरपीएफचे इतर उच्चपद अधिकारी उपस्थित होते. यानंतर त्यांचे पार्थिव हॅलिकॉप्टरने बेगूसराय या त्यांच्या राहत्या गावी रवाना करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


शहीद पिंटू सिंह यांना श्रद्धांजली देण्यासाठी पटना एअरपोर्टवर मुख्यमंत्रीही नव्हते किंवा त्यांच्या मंत्रीमंडळातील कोणीही व्यक्ती उपस्थित नसल्याचे सांगण्यात येत आहे. 'नेटवर्क 18' ने यांसदर्भातील वृत्त दिले आहे. विरोधी पक्षांतील कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष मदन मोहन झा यांच्या व्यतिरिक्त कोणताही दुसरा नेता उपस्थित नव्हता. शहीद पिंटू सिंह यांचा पार्थिव नेण्यासाठी त्यांची बहीण आणि वहीनी विमानतळावर उपस्थित होत्या. 


सीआरपीएफचे इंस्पेक्टर पिंटू सिंह शुक्रवारी संध्याकाळी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झाले. ते बेगूसराय येथील बखरी येथील चक्की गाव येथे राहणारे होते. पटना विमानतळावरून शहीद पिंटू कुमार सिंह यांचे पार्थिव त्यांच्या वडीलांचे गाव बखरी येथे नेण्यात आले. आपल्या शहीद पुत्राच्या अंतिम दर्शनासाठी नागरिक मोठ्या संख्येने पोहोचले होते.