नवी दिल्ली : विरोधी पक्ष आज मोदी सरकार विरुद्ध लोकसभेत अविश्वास ठराव मांडणार आहे. 2019 च्या निवडणुकीआधी हे मोदी सरकारचं शक्तीप्रदर्शन असेल. विरोधी पक्षाला देखील एकजुटता दाखवण्याची संधी मिळणार आहे. लोकसभेमध्ये होणाऱ्या या चाचणीत हे स्पष्ट होईल की कोण मोदी सरकारच्या बाजुने आहे आणि कोण त्यांच्या विरोधात. यावेळी शिवसेनेची भूमिका देखील महत्त्वाची मानली जात आहे.


टीडीपीने नरेंद्र मोदी सरकारविरोधात जो अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात किंवा बाजूनं शिवसेना मतदान करणार नसल्याची माहिती समोर येते आहे. प्रस्तावाच्या वेळी चर्चेत शिवसेना सहभागी होणार आहे, मात्र मतदान करताना शिवसेना खासदार गैरहजर असणार आहेत. एकंदरीत या प्रस्तावावर शिवसेना तटस्थ राहणार आहे. पण आता बीजेडीने देखील या मुद्द्यावर चर्चा सुरु होण्याआधीच लोकसभेतून सभा त्याग केला आहे. उडिसाच्या बीजेडी पक्षाचे लाकसभेत 20 खासदार आहेत. याचा फायदा सत्ताधारी भाजपला होणार आहे.