नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमधील एटीएममध्ये गेल्या काही दिवसांत कॅश उपलब्ध नसल्याने नोटाबंदीसारखी समस्या निर्माण झालीये. लोकांचा वाढता त्रास पाहता अखेर रिझर्व्ह बँक आणि सरकारने पावले उचलायला सुरुवात केलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या राज्यांत कॅशची कमतरता आहे तेथील समस्यांचे निराकरण केले जात असून लवकरच परिस्थिती सामान्य होईल. रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाम, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यात लोकांनी गरजेपेक्षा अधिर कॅश काढल्याने एटीएममधून पैसे मिळत नाहीयेत.


सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही राज्यांमध्ये बैसाखी, बिहू आणि नववर्षाचे सण साजरे केले जात असल्याने लोकांना अधिक कॅशची गरज होती. यामुळेच एटीएममध्ये कॅश उपलब्ध नाहीये. एटीएममध्ये कॅशची कमतरता असल्याने कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी अर्थ मंत्रालयाने रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलीय. 


सूत्रांच्या माहितीनुसार, कॅशच्या उपलब्धतेमध्ये असे चढ-उतार सुरुच असतात. एखाद्या राज्यामध्ये कॅशची मागणी वाढते तर दुसऱ्या राज्यातून याची पूर्तता केली जाते. उदाहरणार्थ आसाममध्ये शनिवारी बिहू सण असल्याने काही दिवसांपूर्वी तेथील कॅश वाढवण्यात आली. यासाठी दुसऱ्या राज्यांचा पुरवठा कमी करण्यात आला. 


यासोबतच कर्नाटकमध्ये निवडणुका जवळ आल्यात त्यामुळे तेथेही कॅशची मागणी वाढलीये. तसेच आणखी काही राज्यांमध्येही निवडणुका होणार आहेत तेथेही कॅशची अधिक गरज भासणार आहे.