चंद्रशेखर भुयार, उल्हासनगर : सत्ताधारी भाजपला राम मंदिराशी काही देणं घेणं नसून त्यांना फक्त पुन्हा एकदा देशात त्यांचं सरकार हवं आहे आणि त्यासाठीच चाललेले हे जुमले आहेत असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर तुफान टीका केली. उल्हासनगरमध्ये झालेल्या पक्षाच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुका जवळ आल्यानंतर भाजपला राम मंदिराची आठवण झाली असून यावरून भविष्यात हिंदू मुस्लीम दंगली घडवण्याचा सरकारचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप यावेळी भुजबळांनी केला. तसंच राफेल घोटाळा आणि सीबीआय महासंचालकांच्या उचलबांगडीवरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केलं. एकीकडे हिंदुस्थान एरोनॉटिक्स सारखी सक्षम कंपनी आपल्याकडे असताना ज्यांनी कधी खेळण्यातलं विमानही तयार केलं नाही. त्या अनिल अंबानींना विमान तयार करायला सांगणं आणि साडेपाचशे कोटींचं विमान साडेसोळाशे कोटींना विकत घेणं याची साधी कारणंही मोदी सांगू शकत नसल्याचं भुजबळ म्हणाले.


५६ इंचाच्या छातीत धडकी भरली 


सीबीआय महासंचालक आलोक वर्मा यांनी राफेल घोटाळ्याची चौकशी सुरू केल्यानं ५६ इंचाच्या छातीत धडकी भरली आणि त्यातूनच त्यांची उचलबांगडी झाल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. मोदी हे सर्वसामान्यांशी मन की बात करतात, पण अदानी, अंबानी यांच्याशी धन की बात करतात, अशी घणाणाती टीका त्यांनी केली. साडेचार वर्षात मोदी सरकारनं काहीही केलेलं नाही, आणि त्यामुळंच आता न मागता सरकार आपल्याला अनेक गोष्टी देईल, याचंच उदाहरण म्हणजे सवर्ण आरक्षण असल्याचं भुजबळ म्हणाले. तर हनुमानाच्या जातीवरून अकलेचे तारे तोडणाऱ्या भाजप नेत्यांनीही भुजबळांनी चांगलीच शाळा घेतली. 


या सभेला राष्ट्रवादी नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी मंत्री गणेश नाईक, स्थानिक आमदार ज्योती कलानी असे राष्ट्रवादीचे मातब्बर नेते उपस्थित होते. तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी सभेला मोठी गर्दी केली होती.