मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला असतानाच या विषाणूच्या नव्या व्हॅरिएंटनं पुन्हा एकदा धोक्याची सूचना दिली आणि पाहता पाहता या नव्या स्ट्रेनचा संसर्गही वाढू लागला. देशभरात शिथिल करण्यात आलेले नियम पुन्हा एकदा कठोर करण्यास सुरुवात झाली. प्रशासनानं सतर्क राहत काही महत्त्वाची पावलं उचलली. महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटले. (concerns over third wave Uttarakhand extends COVID-19 curfew till September 21)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात नियमांमध्ये शिथिलता येताच नागरिकांनी पर्यटनास प्राधान्य दिलं. यामध्ये परराज्यात जाणाऱ्य़ांची संख्या जास्त होती. हिमाचल, उत्तराखंड यांसारख्या राज्यांना नागरिकांनी पसंती दिली. पण, आता मात्र याच राज्यांमध्ये कोरोना लॉकडाऊन लागू करत त्याचा कालावधीही वाढवण्यात येत असल्याचं कळत आहे. 


नुकतंच उत्तराखंड सरकारनं राज्यात लागू असणारा लॉकडाऊन आणखी सात दिवसांनी वाढवला आहे. परिणामी आता 21 सप्टेंबरपर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम असेल. असं असलं तरीही काही नियमांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णयही प्रशासनानं घेतल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलं आहे. 


उत्तराखंडमध्ये कार्यालयीन कामकाज 100 टक्के उपस्थितीत सुरु असेल. तर, दुकानं सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु असतील असं सांगण्यात आलं आहे. राज्यातील वॉटरपार्क 50 टक्के क्षमतेनंच सुरु राहतील असे निर्देश प्रशासनानं दिले आहेत. 


राज्य़ात सर्व सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर बंदी असेल. राज्य शासनानं स्थानिक भागांमध्येही निवडक पातळीवर कोरोना नियमांमध्ये शिथिलता आणण्याचं स्वातंत्र्य तेथील प्रशासनाला देऊ केलं आहे. थेट पर्यटनबंदी न करता या राज्यात येणाऱ्या पर्यटकांनीही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं असं आवाहन करण्यात येत आहे. लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या आणि कोरोना चाचणीचा निगेटीव्ह रिपोर्ट असणाऱ्या नागरिकांना राज्यात प्रवेश देण्यात येत आहे.