Renuka Chowdhury Tweet: काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरातमधील (Gujarat) सूरत कोर्टाने (Surat Court) मोदी आडनावाच्या उल्लेखावरुन दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून संपूर्ण देशभरात आंदोलन केलं जात आहे. सूरत कोर्टाच्या निर्णय़ानंतर विरोधक आक्रमक झाले असून दुसरीकडे काँग्रेसही जशास तसं उत्तर देण्याची तयारी करत आहे. काँग्रेस नेत्या रेणुका चौधऱी (Renuka Chowdhury) यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अब्रुनुकसानीचा खटला (defamation suit) दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये संसदेत बोलताना त्यांचा 'शूर्पणखा' असा उल्लेख केला होता. याचप्रकरणी ह खटला दाखल केला जाणार असून रेणुका चौधऱी यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. 
 
रेणुका चौधरी यांनी ट्विटरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या विधानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नरेंद्र मोदी रेणुका चौधरी यांच्या हसण्याची तुलना रावणाची बहिण 'शूर्पणखा'शी करताना दिसत आहेत. यानंतर सभागृहात सर्वच सत्ताधारी खासदार हसू लागले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

""या क्लासलेस अतीमहत्वाकांक्षी व्यक्तीने मला सभागृहात शूर्पणखा म्हणून संबोधले होते. मी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार. बघूया आता न्यायालये किती जलद कारवाई करतात," असं रेणुका चौधरी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 



राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर रेणुका चौधरी यांनी हे ट्वीट केलं आहे. राहुल गांधी यांनी ‘मोदी’ आडनावावरून केलेल्या टिप्पणीवरून कोर्टाने त्यांना मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींना लक्ष्य करत 'सर्व चोरांचं आडनाव मोदी का असतं?' असं विधान केलं होतं. कोर्टाने नंतर राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला. निर्णयाला आव्हान देण्यासाठी त्यांना 30 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. 


राहुल गांधींची खासदारकी धोक्यात?


राहुल गांधी यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्यांची खासदारकी जाणार का? अशी चर्चा रंगली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, राहुल गांधी अपात्र ठरत असल्यामुळे बडतर्फीची शक्यता आहे. दरम्यान काँग्रेसने आपण याप्रकरणी कायदेशीर सल्ला घेत असून हायकोर्टात जाण्याच्या पर्यायाची तपासणी करणार असल्याचं सांगितलं आहे. 


जर राहुल गांधींवर अपात्रतेची कारवाई झाली तर तर वायनाड लोकसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीची घोषणा होऊ शकते. दरम्यान हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाने सूरत कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला तर राहुल गांधींचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द होईल. याशिवाय त्यांच्यावर पुढील ८ वर्षे निवडणूक लढण्यासाठी बंदी असेल.