Cyclone Michong: मान्सूननंतरचा आणि हिवाळ्यादरम्यानचा काळ हा वादळांच्या निर्मितीसाठी अतिशय पूरक असतो असं हवामान[ विभागानं यापूर्वीच सूचित करत येत्या काळात लहानमोठी चक्रीवादळं निर्माण होणार असा इशाराही दिला होता. याच धर्तीवर काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होऊन आता त्यांचं रुपांत चक्रीवादळामध्ये झालं आहे. बंगालच्या उपसागरावर घोंगावणाऱ्या या वादळाचं नाव 'मिचौंग' असून, आता ते आणखी घातक होताना दिसत आहे. येत्या काळात (मंगळवारी) हे वादळ ताशी 100 किमी वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांसह आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मछलीपट्टणमदरम्यान धडकण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि ओडिशाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या रेल्वे मार्गांवरून जाणाऱ्या साधारण 144 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मिचौंग चक्रीवादळामुळं आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओडिशामध्ये तूफान पावसाची शक्यता असल्यामुळं इथं बचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत. सदर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परिस्थितीसंदर्भातील चर्चा केल्या असून, वेळप्रसंगी लागेल ते सर्व सहकार्य करण्याची हमी दिली आहे. 


सध्या कुठंय चक्रीवादळ? 
सध्याच्या घडीला हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये दक्षिण पश्चिमेला असून, येत्या काळात ते उत्तर पश्चिमेला पुढं सरकणार आहे. पुढं तामिळनाडूच्या किनाऱ्यांवरून हे वागळ पश्चिम - मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत जाणार आहे. यानंतर मंगळवारी दुपारच्या सुमारास ते रौद्र रुप धारण करेल. 



वादळामुळं रविवारपासूनच ओडिशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. येथील मल्कानगिरी, कोरापट, रायगडा, गजपति, गंजम जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. पुढील तीन दिवसांसाठी या भागांना पावसाचा तडाखा सोसावा लगणार आहे. आयएमडीनं ही एकंदर परिस्थिती पाहता या भागांमध्ये पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला असून, मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. तिथं तामिळनाडूमध्येसुद्धा किनारपट्टी भागांमध्ये न जाण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. 


हेसुद्धा वाचा : विदर्भावर अवकाळीचं सावट कायम; यंदाच्या हिवाळ्याबाबत हवामान विभागानं दिला गंभीर इशारा 


वादळाची एकंदर तीव्रता पाहता आंध्र आणि तामिळनाडूच्या किनाऱ्यालहत असणाऱ्या इमारती आणि कच्च्या बांधकामांना मोठं नुकसान पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, इथून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. याशिवाय इथं वीजपुरवठाही खंडित होऊ शकतो ज्यामुळं नागरिकांना सुरक्षित स्थळीच थांबण्याचा सल्ला प्रशासन देत आहे. 


गुजरातपर्यंत परिणाम 


वादळाचे परिणाम गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्येही दिसू लागले असून रविवारी भरूचमध्ये मुसळधाल पावसानं हजेरी लावली. ज्यामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. येत्या काळातही गुजरातच्या बहुतांश भागांना पावसामुळं फटका बसू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.