नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील भजनपुरा भागात एका घरात पाच जणांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. ही घटना भजनपुराच्या मार्ग क्रमांक ११परिसरातील आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत. पोलिसांनी सांगितले, आत्महत्या की खून आहे याचा तपास करीत आहोत. पाच मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी हे कुटुंब एका घरात भाड्याने राहण्यास आले होते. नवरा बायको आणि तीन मुले असे हे कुटुंब होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृतांमध्ये नवरा शंभू कुमार (४५), त्यांची पत्नी सुनीता (३८), मुलगा शिवम (१८), मुलगा सचिन (१६) आणि मुलगी कोमल (१२) अशा पाच जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे घराला बाहेरुन कुलूप लावलेले होते. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला, तेव्हा त्यांना पाच मृतदेह आढळले. पाच दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे.



दिल्लीत नवरा ई-रिक्षा चालक होता. चार ते पाच दिवसांपूर्वी या सर्वांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. पोलिसांना सकाळी ११.३०च्या सुमारास घरातून दुर्गंधी येत असल्याचा फोन आला. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि तपास केला. त्यावेळी पाचही मृतदेह जमिनीवर पडलेले होते. मृतदेहांची हालद गंभीर झालेली होती. त्यांची ओळख पटविणे कठिण झाले होते. हे सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मृत्यूचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.