नवी दिल्ली: दिवळीची छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आतूरतेनं वाट पाहत असतात. दिव्यांची भव्य रोषणाई आणि त्यामध्ये आनंद द्विगुणीत कऱण्यासाठी फोडण्यात येणारे फटाके यामुळे सर्वजण आनंदात असतात. मात्र या फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायू प्रदूषण होतं हे देखील तेवढंच खरं आहे. अनेकजण इको-फ्रेंडली फटाक्यांकडे देखील वळत असल्याचं पाहायला मिळत आहे.  मात्र आता हे फटाक्यांवरच पूर्णपणे बंदी आणण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणाची एकूण स्थिती पाहता तिथल्या सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राजधानी दिल्लीमध्ये सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. यावर्षी फटाक्यांवर पूर्णपणे बंदी लावण्यात आली आहे. फटाके न फोडल्याने अनेक लोकांचे प्राण वाचवण्याचं काम आपण करणार आहोत. 


यंदा 4 नोव्हेंबरपासून दिवाळी मोठ्या उत्साहात देशभरात साजरी कऱण्यात येणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटरवरून दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 3 वर्षांपासून दिवाळी दरम्यान दिल्लीच्या प्रदूषणाची धोकादायक स्थिती पाहता, सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या गोडाऊनवर, विक्री आणि वापरावर संपूर्ण बंदी लावण्यात आली आहे.




गेल्यावर्षीची परिस्थिती पाहून यंदा व्यापाऱ्यांना अरविंद केजरीवाल यांनी फटाके साठवून ठेवू नये असं आवाहन केलं आहे. यंदा पूर्णपणे फटाक्यांवर बंदी लावण्यात आल्याने व्यापाऱ्यांनीही हे पाळावं असं सांगितलं आहे. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने फटाके बंदीच्या एनजीटीच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.


न्यायालयाने म्हटलं होतं की एनजीटीच्या आदेशात हे स्पष्ट आहे की ज्या भागात हवेची गुणवत्ता खराब असेल तिथे फटाके विक्री आणि साठवण्यासाठी बंदी असेल. हवेची गुणवत्ता अधिक चांगली असेल अशा ठिकाणी परवानगी दिली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने एनजीटीच्या आदेशाविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली होती.