कोलकाता: लोकसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचण्यांच्या (एक्झिट पोल) निकालांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले. अंतिम टप्प्याचे मतदान संपल्यानंतर रविवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर ममतांनी यासंदर्भात ट्विट केले. त्यामध्ये ममतांनी म्हटले आहे की, एक्झिट पोलच्या आकडेवारीवर माझा अजिबात विश्वास नाही. यामागे हजारो ईव्हीएम यंत्रे बदलण्याचा किंवा त्यामध्ये फेरफार करण्याचा भाजपचा डाव आहे. अशावेळी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आणि खंबीर राहावे, असे आवाहन मी करते. आपण ही लढाई एकत्र लढुयात, असे ममता यांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी ममता यांनी नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथ दौऱ्यावरही टीका केली होती. मोदींचा हा दौरा आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप ममता यांनी केला होता. 



भाजपप्रणित एनडीएला यंदा बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. परिणामी यंदा त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असा दावा विरोधकांकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी केला जात होता. मात्र, काल समोर आलेल्या आकेडवारीनुसार मोदी सरकार पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत येण्याची दाट शक्यता आहे. या आकडेवारीमुळे विरोधकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले होते. 


यानंतर विरोधी पक्षांना नाईलाजाने आपल्या रणनीतीमध्ये बदल करावा लागला आहे. 'बसपा'च्या सर्वेसर्वा मायावती दिल्लीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेणार होत्या. मात्र, सोमवारी 'बसपा'कडून ही भेट आता रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच येत्या २१ तारखेला सर्वपक्षीय विरोधकांची होणारी बैठकही २४ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.