रामराजे शिंदे, नवी दिल्ली : केंद्र सरकार तिन्ही कायदे मागे घेत नसल्याने आता शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबर रोजी भारत बंद करण्याची घोषणा केली आहे. सिंधू बोर्डर येथे पत्रकार परिषद घेऊन शेतकरी संघटनांनी भारत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन सर्व संघटनांना केलं आहे. दिल्ली - गाझीपूर बोर्डर बंद करण्यात आली आहे. उद्या सरकार सोबतच्या चर्चेतून तोडगा निघाला नाही तर दिल्लीतील भाजीपाला तसेच इतर सामग्री बंद करण्याचा इशाराही संघटनेनं दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय किसान युनियनचे (बीकेयू-लाखोवाल) सरचिटणीस एचएस लखोवाल यांनी सिंधू सीमेवरील (दिल्ली-हरियाणा सीमा) पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, गुरुवारी आम्ही सरकारला सांगितले की, 'नवीन कृषी कायदे मागे घ्यावेत. सरकारने आमचे म्हणणे न ऐकल्यास 8 डिसेंबर रोजी भारत बंद करण्यात येईल.' अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस हन्नान मुल्ला म्हणाले की, 'याला फक्त पंजाब चळवळ म्हणणे सरकारचे षडयंत्र आहे, पण आज हे आंदोलन संपूर्ण भारतभर सुरू आहे आणि पुढेही होईल. हे शेतकऱ्यांनी दाखवून दिले. सरकारने उद्या कायद्यात दुरुस्तीबाबत चर्चा केल्यास ती स्वीकारणार नाही असा निर्णय आम्ही घेतला आहे.'


दिल्लीला लागून असलेल्या हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना हटवण्यासाठी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यानी शेतकऱ्यांना सीमेवरुन हटवण्याची मागणी केली आहे. गेल्या 8 दिवसांपासून केंद्रीय कृषी कायदा मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.