नवी दिल्ली : जम्मू- काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात असणाऱ्या अवंतीपोरा भागात गुरुवारी एका आत्मघाती हल्ल्यामध्ये सीआरपीएफच्या ४४ जवानांचा जीव गेला. जैश-ए-मोहमम्द या संघटनेकडून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली. ज्यानंतर पाकिस्तानकडून समर्थन मिळणाऱ्या या दहशतवादी कारवाईचा साऱ्या जगाने तीव्र शब्दांत निषेध केला. पण, खुद्द पाकिस्तानने मात्र हे आरोप आणि हा रोष परतवून लावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने उलट्या बोंबा मारायला सुरूवात करत या हल्ल्याबाबत चौकशी न करताच पाकिस्तानवर आरोप करणं तातडीने थांबवा असं म्हणण्यास सुरुवात केली आहे. जैश-ए-मोहम्मद या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. ही दहशतवादी संघटना पाकिस्तानतून कार्यरत आहे, तिचा म्होरक्या मसूद अझर हा पाकिस्तानात मोकाट फिरत आहे. तरीही पाकिस्तानचं हे आरोप परतवून लावण्याची एकंदर भूमिका पाहता त्यांची भूमिका अनेकांनाच भुवया उंचावण्यास भाग पाडत आहे. 


भारतात झालेला दहशतवादी हल्ला ही अत्यंत गंभीर बाब असून, या आरोपांशी काहीही पडताळणी न करता पाकिस्तानचं नाव जोडू नका असं म्हटलं आहे. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकात हे विधान करण्यात आलं आहे. पाकिस्ताननेही नेहमीच जगाच्या कोणत्याही ठिकाणी होणाऱ्या हिंसक घटनांचा विरोध केला आहे ही बाब समोर आणत भारतीय माध्यमं आणि शासनाकडून लावण्यात येणारे आरोप त्यांनी फेटाळले आहेत. 



मोदींनी दिला होता सडेतोड प्रत्युत्तर देण्याचा इशारा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत पुलवामा हल्ल्य़ाविषयीची आपली भूमिका स्पष्ट करत पाकिस्तानला सावध राहण्याचा इशारा दिला होता. एक मोठी चूक करुन बसलेल्यांना या कृत्याची शिक्षा मिळणारच असं त्यांनी स्पष्ट करत पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीवरही वक्तव्य केलं होतं.