नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचं सहाव्या टप्प्यातील मतदान रविवार होत आहे. या टप्प्यात ५९ जागांसाठी मतदान होत आहे. ९७९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. दिग्विजय सिंह, अखिलेश यादव, केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि प्रज्ञासिंह ठाकूर या प्रमुख लढतीकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान,  भोपाळमध्ये मतदान होत असून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भाजपने मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूरला उमेदवारी दिली आहे. भाजपने  काँग्रेसच्या भगव्या दहशतवाद्याला उत्तर म्हणून प्रज्ञासिंह हिला उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


यांची खरी कसोटी


समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, केंद्रीय मंत्री मनेका गांधी, हर्षवर्धन, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, बॉक्सर विजेंदर सिंग, केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह, नरेंद्रसिंह तोमर, रवी शंकर प्रसाद, रामकृपाल यादव, अश्विनीकुमार चौबे, राजकुमार सिंह, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य शिंदे हे या सहाव्या टप्प्यातील प्रमुख उमेदवार आहेत. 



उत्तर प्रदेशातील १४, मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी ८ जागांसाठी मतदान होत आहे. हरियाणातील सर्व १० आणि दिल्लीतील सर्व ७ जागांवर उद्या मतदान होणार आहे. भाजपसाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे. २०१४च्या निवडणुकीत भाजपने  ४४ जागा जिंकल्या होत्या. या जागा राखण्याचे आव्हान भाजपपुढे असणार आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्वांचलमधील १४ जागांवर मतदान होत असून काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांची परीक्षा घेणारा हा टप्पा आहे. भाजप, काँग्रेस आणि सपा-बसपा आघाडी अशी तिरंगी लढत या १४ जागांवर होत आहे. गेल्यावेळी या १४ पैकी १३ जागा भाजपने जिंकल्या होत्या. आझमगडची एकमेव जागा सपाकडे गेली होती. मुलायमसिंह यादव यांनी येथे विजय मिळवला होता. यावेळी येथे सपाकडून अखिलेश यादव निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या जागेकडे लक्ष लागले आहे.


दिल्लीत यावेळी 'आप'ने जोरदार बाजी लावली आहे. त्यामुळे  २०१४ मध्ये दिल्लीतील सातही जागा भाजपने जिंकल्या होत्या. यावेळी दिल्लीत भाजप, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत होत असून मतविभाजनाचा फायदा कुणाला होणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.



 हरियाणात भाजपची सत्ता असून गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने येथे १० पैकी ७ जागा जिंकल्या होत्या. पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिली. त्यामुळे राज्यात यावर्षीच विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने सर्वच पक्षांनी लोकसभेसाठी जोर लावला आहे. येथे काँग्रेसने आम्ही चमत्कार करणार असल्याचे म्हटले आहे.