Ganesh Utsav 2024 Couple Rs 4 Lakh Mistake: वाजतगाजत गणरायाचं विसर्जन करुन ते घरी आले आणि त्यानंतर अचानक त्यांच्या लक्षात आलं की गणपतीच्या मूर्तीवर घातलेली खरी सोनसाखळी गणपतीबरोबरच विसर्जित केली. त्यानंतर जो काही ड्रामा सुरु झाला तो पुढे 10 तास सुरु होता. या साऱ्या प्रकारात संपूर्ण तलाव उपसण्यापासून ते थेट स्थानिक नेत्यांपर्यंत सारा गाव गोळा झाला. या साऱ्याचा शेवट कसा झाला पाहूयात...


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सारा प्रकार घडला कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये. या ठिकाणी रामय्या आणि उमादेवी या जोडप्याने दीड दिवसांच्या घरगुती गणपतीचं विसर्जन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी बाप्पाच्या मूर्तीवर चढवलेली खरी सोनसाखळी विसर्जन करताना काढलीच नव्हती. या सोनसाखळीची किंमत 4 लाख रुपये इतकी असल्याने घडलेला प्रकार समोर आल्यानंतर दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. ही सोनसाखळी शोधण्यासाठी तब्बल 10 हजार लीटर पाणी उपसण्यात आलं. तसेच 300 गणेश मूर्तींचं विसर्जन केलेल्या तलावामधील गाळ शोधून काढण्यासाठी अगदी माणसं नेमली.


नेमका कुठे घडला हा प्रकार?


विजयनगरमधील दहशरहाली सर्कल येथे हा प्रकार घडल्याचं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे. हा सारा प्रकार दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या वेळी घडला आणि ही सोनसाखळी विसर्जन घाटावर काम करणाऱ्या एका मुलाने केलेल्या मार्गदर्शनामुळे अनेकांच्या मदतीने दुसऱ्या दिवशी सकाळी सापडली. गणपतीच्या मूर्तीवर विसर्जनाच्या वेळी फुलांच्या माळा आणि इतर सजावट तशीच ठेवण्यात आल्याने ही खरी सोनसाखळी काढली नाही हे रामय्या आणि उमादेवी यांनी विसर्जन करुन घरी गेल्यानंतर समजलं. 


नक्की वाचा >> मुंबईत उंच गणेश मूर्तींचा ट्रेंड सुरु करणारा मूर्तीकार कोण? मेहनत पाहून कराल सलाम


सोनसाखळी पाहिली पण...


आपण सोनसाखळीसहीत गणरायाच्या मूर्तीचं विसर्जन केल्याचं लक्षात आल्यानंतर या दोघांनी तातडीने या कृत्रिम तळ्याकडे धाव घेतली. गणेश मूर्तीचं विसर्जन करणाऱ्या मुलाने मूर्तीच्या गळ्यात सोनसाखळी पाहिली होती. मात्र ती नकली असेल म्हणून ठेवली आहे. असं वाटून त्याने मूर्तीचं विसर्जन केलं. यासंदर्भात आपण एकदा विसर्जनाआधी विचारपूस करायला हवी होती, असं या तरुणांनी सारा प्रकार लक्षात आल्यानंतर म्हटलं.


आमदाराने माणसं मदतीला पाठवली


तातडीने स्थानिक आमदार प्रिया कृष्णा यांनाही कळवलण्यात आलं. महिला आमदाराने ही सोनसाखळी शोधण्यासाठी मदतीला 10 माणसं पाठवली. दहा तास चिखल, पाण्यात शोध घेतल्यानंतर अखेर ही सोनसाखळी सापडली आणि या दोघांचा जीव भांड्यात पडला. या जोडप्याला त्यांची हारवलेली सोनसाखळी परत मिळाल्याने इतरांनीही समाधान व्यक्त केलं.