नवी दिल्ली: 'किसान सन्मान निधी' योजनेत बदल करण्यात आला आहे. दुसरा हफ्ता मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना 'आधारकार्ड'ची गरज भासणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. याआधी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पहिला हफ्ता मिळवण्यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आली होती. परंतु, सरकारच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांना आधारकार्ड दाखवणे अनिवार्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील महिन्यांत मांडण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये सरकारने किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये जमा होणार असल्याची घोषणा केली होती. तसेच या योजनेला मंजुरीही मिळाली होती. मात्र हे सहा हजार रुपये तीन टप्प्यांत शेतकऱ्यांच्या खात्यावर नियमितपणे जमा होतील, असेही सांगितले होते. मिळालेल्या माहितीनुसार, बऱ्याच शेतकऱ्यांनी या योजनेतून फायदा मिळवला. 


ग्रामीण भागातील कित्येक शेतकऱ्यांचा आधार कार्डवर चुकीचा तपशील असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पहिला हफ्ता मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला होता. शेतकऱ्यांचा आधार कार्डवर चुकीचा तपशील असल्यामुळे त्यांच्या खात्यावरील पैसे काढताना त्यांना अडचणी निर्माण होत असल्याचे सरकारच्या लक्षात आले. म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने आधार कार्ड अनिवार्य नसल्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयांमुळे ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच किसान सन्मान निधी योजनेचा दुसरा हफ्ता म्हणून १ एप्रिल रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत, असे या बैठकीत सांगण्यात आले.