नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसोबतच ११ राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यासाठी भाजपनं मोर्चेबांधणी सुरु केली आहे.  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आजच विधी आयोगाला पत्र पाठवून एकत्र निवडणुका घेण्याची मागणी केली.
 
 भाजपची ही रणनीती यशस्वी ठरली तर महाराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी होतील, अशी शक्यता आहे. महाराष्ट्रासोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, हरयाणा, झारखंड, मिझोराम आणि बिहारमध्ये लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घ्याव्यात, असा भाजपचा आग्रह असल्याचे समजते. 
 
 त्यादृष्टीने अन्य राजकीय पक्षांचं एकमत व्हावं, यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत. तसे  झाल्यास संविधानात कोणताही बदल न करता, एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेता येऊ शकतात. मात्र, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस यासारख्या राजकीय पक्षांचा एकत्र निवडणुका घ्यायला ठाम विरोध आहे.