विशाखापट्टणम :  विशाखापट्टणम गॅस गळती अपघातात मृतांचा आकडा 10 वर पोहोचला आहे. सुरुवातीच्या तपासणी अहवालात हा अपघात गॅस वॉल्वमुळे झाल्याचे उघडकीस आले आहे. गुरुवारी पहाटे अडीच वाजता गॅस वॉल्व खराब झाला आणि विषारी गॅस बाहेर पडला. सध्या हा प्राथमिक तपास अहवाल आहे. याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गॅसचा वॉल योग्यप्रकारे हाताळले गेले नाही आणि ते फुटला. यामुळे गळती सुरु झाली. पण यानंतर कारखान्याच्या आजुबाजुच्या स्थानिक ग्रामस्थांना कारखान्याचा कोणताही धोकादायक सायरन ऐकू आला नाही. यामुळे अधिक लोकं चक्कर येऊन पडले.


विशाखापट्टणममधील प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्यानंतर एलजी केम यांनी म्हटले की, गॅस गळतीची परिस्थिती आता नियंत्रणात आहे आणि पीडितांना तातडीने उपचार देण्यासाठी सर्व पद्धती अवलंबल्या जात आहेत. कंपनीने म्हटले आहे की आम्ही या प्रकरणाचा तपास करीत आहोत जेणेकरून गळती आणि मृत्यूचे नेमके कारण शोधता येईल.


विशाखापट्टणममधील या गॅस गळतीमुळे लोकांमध्ये धावपळ झाली. तेथे गॅस गळतीमुळे श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने लोकं पळू लागले. काही जण रस्त्यावर बेशुद्ध पडू लागले. गॅस गळतीमुळे आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 316 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


अपघातावेळी सुमारे दोन हजार लोकं या प्लांट जवळ होते. जेव्हा ​​श्वसनाला त्रास होऊ लागला तेव्हा लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. काही लोक जवळच्या नाल्यातही पडले, त्यानंतर बरेच लोक रस्त्यावर बेशुद्ध झाले. 


विषारी वायूचा सर्वाधिक परिणाम मुलं आणि वृद्धांवर झाला. जवळपासची रुग्णालये लोकांनी भरली आहेत. सुमारे तीन किलोमीटरच्या परिसरात या गॅसचा परिणाम दिसून आला. त्याचा परिणाम असा झाला की आजूबाजूच्या परिसरातील बरीच जनावरेही बेशुद्ध झाली. सकाळी दहाच्या आधी यावर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. पण बचावकार्य अजून सुरू आहे.