मुंबई : तेलंगाणा विधानसभेच्या निवडणूकांचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आता या प्रतिष्ठेच्या निवडणुकीतीच महत्त्वाचा निकाल समोर येत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार AIMIM च्या अकबरूद्दीन ओवेसी विजयी झाले आहेत. चंद्रयान गुट्टा या मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत. अकबरुद्दीन ओवेसी हे असदुद्दीन ओवेसी यांचे बंधू आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेलंगणा विधानसभेत ११९ जागांसाठी ७ डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. देशातील पाच राज्यांमध्ये असणाऱ्या निवडणुकांच्या निकालांकडे सर्वांचच लक्ष लागून राहिलेलं असताना तेलंगाणाकडेही अनेकांचच विशेष लक्ष होतं. 


या ठिकाणी सत्तेत असलेली टीआरएस, कॉंग्रेस-टीडीपी युती आणि भाजपामध्ये त्रिकोणीय सामना सुरु असल्याची परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी वेळे आधीच निवडणुका घेण्याचा निर्णय घेत मोठी खेळी खेळल्याचंही म्हटलं जात आहे. 


मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राजीनामा दिल्यामुळे मुदतपूर्व निवडणुका होत आहेत. तिथेही त्यांचा तेलंगणा राष्ट्र समिती हाच पक्ष पुन्हा सत्तेवर येण्याची चिन्हं एक्झिट पोल्समधून दिसत आहेत. त्यामुळे येत्या काळात मतदार राजाने नेमकं कोणाला निवडून दिलं आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास स्थानिक नेतृत्वाने घेतलेला निवडणूकीचा निर्णय पथ्यावर असल्याचं चित्र सध्याच्या क्षणाला पाहायला मिळत आहे. 


गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तेलंगणातील एकंदर परिस्थितीविषयी आपली प्रतिक्रिया देत भाजपाचं प्रदर्शन नक्कीच चांगलं असेल असा विश्वास व्यक्त केला आहे. कल येण्यास आता कुठे सुरुवात झाली असल्याचं म्हणत भाडपाच्या कामगिरीविषयी ते आशावादी दिसले. त्यामुळे आता त्यांचा हा विश्वास कितपत सत्यात उतरतो हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. 


तेलंगणात सध्याच्या घडीला बहुमतासाठी एकूण ६० जागांवर विजय मिळवणं गरजेचं आहे. दरम्यान, विजयी उमेदवार अकबरुद्दीन ओवेसी यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या प्रकृतीचं कारण देत ही आपली अखेरची निवडणूक असल्याचं प्रचार सभेदरम्यान सांगितलं होतं.


माझ्याकडे स्वत:साठी वेळ नाही...


एका प्रचारसभेदरम्यान अकबरुद्दीन ओवेसी यांनी आपल्याकडे स्वत:साठी वेळ नसल्याचं म्हटलं होतं. 'शाळा, रुग्णालयं यांसह इतरही सर्व गोष्टींकडे लक्ष देत असतानाच मला स्वत:च्या प्रकृतीकडेही लक्ष देणं तितकच गरजेचं आहे. पण, माझ्याकडे स्वत:साठी वेळच नाही', असं ते म्हणाले होते. ही निवडणून आपल्यासाठी अखेरची निवडणूक असू शकते असं सूचक विधानही त्यांनी प्रचारसभेदरम्यान केलं होतं. त्यामुळे जनतेने त्यांची केलेली निवड पाहता ही इनिंग ओवेसी गाजवतात का, हे पाहणं तितकच महत्त्वाचं ठरणार आहे.