अहमदनगर: आज देशात लोकपाल कायदा असता तर राफेल घोटाळा झाला नसता, असे वक्तव्य ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. ते रविवारी राळेगण सिद्धी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकारने लोकपाल कायदा लागू केला नाही. आज हा कायदा अस्तित्त्वात असता तर राफेल घोटाळा झाला नसता. लोकपाल कायद्याच्या अंमलबाजवणीत चालढकल करून सरकारने जनतेची दिशाभूल केली, असे अण्णा हजारे यांनी म्हटले. येत्या ३० तारखेपासून अण्णा हजारे भ्रष्टाचारविरोधी कायदा व शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राळेगण सिद्धी येथे आमरण उपोषण सुरु करणार आहेत. लोकपालच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांचे गेल्या आठ वर्षांतील हे तिसरे आंदोलन आहे. 


दरम्यान राळेगण सिद्धी येथील पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवरही ताशेरे ओढले. सध्याची परिस्थिती पाहता देश हुकूमशाहीच्या दिशेने जाण्याचा धोका जाणवत असल्याचे त्यांनी म्हटले. गेल्यावर्षी शहीद दिनी उपोषण केल्यानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल, लोकायुक्त प्रश्न सोडविण्यांबाबत लेखी आश्वासन दिले. परंतु, गेल्या ९ महिन्यांत त्याचे पालन केले नाही. शेतमालाला दीडपट हमी भाव, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, वयोवृद्ध शेतकऱ्यांना ५ हजार रूपये निवृत्तीवेतन या प्रश्नी सरकार दिशाभूल करीत आहे. लोकपाल कायदा झाल्यानंतर १ वर्षांच्या आत राज्यात लोकायुक्त कायदा होणे गरजेचे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काहीही कार्यवाही केली नाही. राज्याला देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री मिळाले, असे कौतुक आपण करीत होतो. पण साडेचार वर्षानंतर मुख्यमंत्र्यांची अवस्था 'ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला', अशी झाल्याची टीका अण्णा हजारे यांनी केली.