नवी दिल्ली: भारतीय वायूदलाने मंगळवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकने एकच खळबळ उडवून दिली आहे. वायूदलातील मिराज-२००० या विमानांच्या ताफ्याने ही कारवाई यशस्वीपणे पार पडली. यामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा बालाकोट परिसरातील तळ पूर्णपणे बेचिराख झाला आहे. तसेच या हल्ल्यात १५० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची शक्यताही आहे. १४ फेब्रुवारीला काश्मीरच्या पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ४० जवानांचा मृत्यू झाला होता. याच कारवाईचा बदला म्हणून भारताकडून हा एअर स्ट्राईक करण्यात आला. 
 
 या कारवाईनंतर देशात अनेक ठिकाणी फटाके वाजवून आणि मिठाई वाटून नागरिकांनी आनंद साजरा केला. याशिवाय, सोशल मीडियावर मिम्सचा प्रचंड पाऊस पडत आहे. हल्ल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर ट्विटरसह इतर समाजमाध्यमांवर #AirForce, #TheFreshAirstrike, #JaisheMohammed हे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आले. या माध्यमातून नेटकऱ्यांनी पाकिस्तानी लष्कर आणि इम्रान खान यांची मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडविली.