नवी दिल्ली: भारतातील दुर्गम भागातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर अनेकदा जंगली प्राणी गाडीची धडक लागून मरतात. यामध्ये हत्तींची संख्या ही जास्त आहे. हे अपघात टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने एक अफलातून शक्कल लढवली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी रेल्वेच्या या 'प्लॅन बी'ची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या योजनेनुसार हत्तींचा मार्गात असणाऱ्या रेल्वे ट्रॅकच्या परिसरात एक उपकरण लावण्यात येणार आहे. या उपकरणातून मधमाश्यांच्या गुणगुणण्याचा आवाज येतो. मधमाश्या या हत्तींच्या नैसर्गिक शत्रू आहेत. त्यामुळे हत्ती मधमाश्यांना घाबरतात. परिणामी रेल्वे ट्रॅकच्या परिसरातील या उपकरणाचा आवाज ऐकून हत्ती मागे फिरतात. 


ईशान्य भारतात गेल्यावर्षीपासून हा प्रयोग राबवण्यात येत आहे. त्यामध्ये मोठे यश मिळाले असून हत्तींच्या अपघाताचे प्रमाण खूपच घटले आहे. तब्बल ६०० मीटरपर्यंत या उपकरणाचा आवाज ऐकू जातो. त्यामुळे हत्ती रेल्वे ट्रॅकच्या आसपासही फिरकत नाहीत, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.