Jammu Kashmir Bus Attack : रविवारी जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला (Terrorist Attack) करण्यात आला. दाटीवाटीच्या जंगलांचा आधार घेत लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी एका वाहनातून समोर येत रियासी भागात एका बसवर बेछूट गोळीबार केला आणि या हल्ल्यानंतर गंभीररित्या जखमी झालेल्या चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस दरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला तर 30 जण गंभीर जखमी झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्ला आणि त्यानंतरचा अपघात इतक्या भीषण स्वरुपाचा होता, की पाहणारेही विचलित झाले. हल्ल्याची माहिती मिळताक्षणी सुरक्षा यंत्रणांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत सदर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी शोधमोहिम हाती घेतली. (Reasi Bus Accident)


दरम्यान, सदर हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून निंदा व्यक्त करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या घटनेनं व्यथित झाल्याची पोस्ट करत मृतांच्या नातेवाईकांबरोबर असल्याच्या सहवेदना व्यक्त केल्या. 


विरोधक आक्रमक 


इथं पंतप्रधानांचा शपथविथी सुरु असतानाच तिथं निष्पापांचा बळी गेल्याप्रकरणी आणि देशावर असणारं दहशतवादाचं सावट आणखी गडद होत असल्याचा मुद्दा अधोरेखित करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते, संजय राऊत यांनी x च्या माध्यमातून पोस्ट करत थेट पंतप्रधानांनाच सवाल केल्याचं पाहायला मिळालं. 


हेसुद्धा वाचा : Reasi Bus Accident CCTV Video : लाल मफलर गुंडाळून दहशतवादी आले आणि...; बस हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींकडून धडकी भरवणारं वर्णन 


 


'आधी काश्मीर खोऱ्या दहशतवादी हल्ले आणि तत्सम घटना घडत होत्या. आता 370 कलम हटवल्यानंतर जम्मू भागातही दहशतवादी हल्ले होऊ लागले आहेत. आजही जम्मूमध्ये असाच एक हल्ला झाला ज्यामध्ये दहाजणांचा मृत्यू झाला. मोदी शपथ घेत होते आणि जम्मूमध्ये दहशतवादी रक्तरंजित खेळ खेळत होते. आजही काश्मिरी पंडित त्यांच्या घरी परत जाऊ शकत नाहीत. मोदीजी, पंडित घरी कधी परतणार?, असा उद्विग्न सवाल त्यांनी केला. 






काँग्रेस खासदार राहुल गांधींनीही या घटनेवर तीव्र शब्दात सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. भेकड दहशतवादी हल्ला अत्यंत दुःखद आहे. ही लज्जास्पद असून जम्मू काश्मीरमधील चिंताजनक सुरक्षा स्थितीचं खरं चित्र असल्याचं राहुल यांनी म्हटलं. तर, जम्मू काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी x च्या माध्यमातून या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला. ' हिंसक कृत्यांमुळे शाश्वत शांतता प्रस्थापित होण्यात अडथळा निर्माण होतोय', असं त्यांनी म्हटलं. या आव्हानात्मक काळात सर्व समुदायांनी एकत्र यावं असंही ओमर अब्दुल्ला म्हणाले. 


देशातील सुरक्षा व्यवस्थेमध्ये असणाऱ्या बेजबाबदारपणामुळं हा दशहतवादी हल्ला झाल्याचं म्हणत देशाच्या राजकारणातील हा अती संवेदनशील दिवस अलल्याची प्रतिक्रिया सपाच्या अखिलेश यादव यांनी देत या हल्ल्याची निंदा केली. नेतेमंडळी आणि इतर सर्वच स्तरांतून या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात येत असून, दहशतवादाला समूळ नष्ट करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.