पाटणा:  जनता दलाच्या (संयुक्त) आमदार बीमा भारती यांच्या मुलाच्या मृत्यूच्या घटनेने शुक्रवारी बिहारमधील मोठी खळबळ उडाली. पाटण्यानजीक रेल्वे रुळांच्या शेजारी त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या मृत्यूमागील नेमके कारण अजून समजू शकलेले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. बिहारमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. पाटण्याचे पोलीस अधिक्षक मनू महाराज मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मर्जीतील आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षे त्यांची बदली झालेली नाही. त्यांना हटवल्यानंतर बिहारमधील परिस्थिती सुधारेल, असे राष्ट्रीय जनता दलाचे आमदार भाई वीरेंद्र यांनी सांगितले. 


दरम्यान, मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर बीमा भारती यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर बीमा भारती बराचवेळ माझ्या मुलाला मारुन टाकले, असे बोलत होत्या. त्यामुळे पोलीस हत्येच्या दृष्टीकोनातूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत.