मुंबई : Lemon Price Rise: सध्या देशातील बहुतांश शहरांमध्ये भाज्यांचे भाव झपाट्याने वाढले आहेत. लिंबाच्या वाढत्या भावाने ग्राहक हैराण झाले आहेत. लिंबाचा भाव 350 ते 400 रुपये किलो इतका झाला आहे. लिंबाच्या वाढलेल्या किमतीचा फटका केवळ ग्राहकांनाच नाही तर दुकानदारांनाही बसला आहे. 


लिंबू महागण्याचे कारण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात लिंबाचा तुटवडा आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशातील ज्या भागात लिंबूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते त्या भागात कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. उष्णतेमुळे लिंबू उत्पादनावर परिणाम झाला आहे. सोसाट्याचा वारा आणि उष्णतेमुळे लिंबाची फुले गळून पडत असल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे. 


गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान या भागात लिंबाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. या भागात उकाडा वाढला आहे. उष्णतेमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. 


पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे वाहतूक शुल्कात वाढ झाली आहे. एकीकडे लिंबाचा तुटवडा आणि दुसरीकडे वाढलेले वाहतूक शुल्क, या दोन्ही गोष्टी महागाईला कारणीभूत आहेत.


लग्नसराईत याला अधिक मागणी असते


लग्नसराईचा हंगामही सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत सोहळ्यासाठी लिंबाची मागणी आणखी वाढली आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त, त्यामुळे लिंबाच्या दरातही वाढ होताना दिसत आहे. उन्हाळ्यात उसाच्या रसापासून लिंबूपाणीपर्यंत सर्वत्र लिंबाची गरज असते. अशा स्थितीत या दिवसाआधीच लिंबाचे भाव वाढले आहेत.