मुंबई : लोकसभा निवडणुकांबरोबर विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार या चर्चेने सध्या जोर धरला आहे. विशेषत: मंगळवारी मंत्रिमंडळ बैठक झाल्यावर पुन्हा शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आल्यानंतर ही चर्चा राज्यात सुरु झाली आहे. या शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत काही मेगा निर्णय घेतले जाणार आहेत. त्यानंतर मंत्रीमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री हे विधानसभा बरखास्तीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करतील आणि राज्यापालांकडे राजीनामा सादर करतील अशीही चर्चा रंगू लागली आहे. अर्थात याला दुजोरा कोणाही दिलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आज मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची बैठक आहे. या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकी नंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र होण्याबाबत स्पष्टता येईल असे सांगण्यात येत आहे. विरोधी पक्षाला यासंदर्भात विचारले असता आपल्याला काही माहीती नसल्याचे त्यांनी सांगितले. 



 निवडणूक आयोगाला एक महिना आधी कळवावे लागते, पण राज्य सरकारने तसे काही आयोगाला कळवले नसल्याचे काही आमदारांचे म्हणणे आहे. पण राज्य सरकारने असे कळवल्याचेही सांगण्यात येत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूका लढवण्यासाठी आम्ही तयार असल्याचे भाजपातर्फे सांगण्यात येत आहे. तर शिवसेना यासाठी तयार नसल्याचे समोर येत आहे. भाजपाने अशा प्रकारची तयारी केली होती. त्यामुळे भाजपाकडे प्लान बी तयार आहे. तशाप्रकारच्या सुचना त्यांनी शिवसेनेलाही दिल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याचा मंत्रीमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.