मुंबई : देशातील कलेशी निगडीत तब्बल ६०० हून अधिक लोकांनी एकत्र येत जनतेसाठी एक पत्र लिहिलंय. 'आपले बहुमूल्य मतं द्या, भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांना सत्तेतून बाहेर काढा' असे आवाहन या पत्राद्वारे करण्यात आले आहे. यामध्ये अमोल पालेकर, नसिरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड, एम के रैना, उषा गांगुली यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींचाही समावेश आहे. भारत आणि भारताचं संविधान मोदी सरकारमुळे धोक्यात असल्याचं त्यांनी म्हटलंय.


अमोल पालेकर 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या पत्राचा मजकूर तब्बल १२ भाषांमध्ये तयार करण्यात आलाय. 'आर्टिस्ट युनाईट इंडिया' या वेबसाईटवरून हे पत्रं प्रसिद्ध करण्यात आलंय. 'आगामी लोकसभा निवडणूक ही इतिहासातील सर्वात गंभीर निवडणूक आहे' असंही त्यांनी म्हटलंय. या पत्रावर शांता गोखले, महेश एलकुंचवार, महेश दत्तानी, अरुंधती नाग, कीर्ति जैन, अभिषेक मजुमदार, कोंकणा सेन शर्मा, रत्ना पाठक-शाह, लिलेट दुबे, मीता वशिष्ठ, मकरंद देशपांडे आणि अनुराग कश्यप यांच्यादेखील सह्या आहेत. 


शांता गोखले

आज देशाची मूळ संकल्पनाच धोक्यात आहे. गीत, नृत्यू, हास्य या सर्वच गोष्टींवर बंधनं घालण्यात येत आहेत. आपल्या न्याय संविधान धोक्यात आहे, असंही त्यांनी या पत्रात म्हटलंय. ज्या ज्या संस्थेमध्ये चर्चा आणि असहमतीचा विकास होतो, अशा संस्थांचाच गळा दाबण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय. 


महेश एलकुंचवार 

कोणत्याही वादाशिवाय, असमती आणि विरोधी पक्षाशिवाय काम चांगलं होऊ शकत नाही. परंतु, या सर्वच गोष्टी सरकारकडून संपूर्ण ताकद लावून चुप्प करण्याचा प्रयत्न केला. संविधान आणि आपली सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षत्वाच्या भावनेचं संरक्षण करा... आणि कट्टरता, घृणा आणि निष्ठुरतेला सत्तेतून बाहेर करा, असं आवाहन या पत्राद्वारे करण्यात आलंय. 


अनुराग कश्यप

गेल्याच आठवड्यात अशीच साद भारतीय सिनेनिर्माते आनंद पटवर्धन, सनल कुमार शशिधरन आणि देवाशीष मखीजा यांनीही मतदारांना घातली होती.