नवी दिल्ली : निवडणुका जाहीर झाल्यापासून देशभरातून तब्बल ५४० कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अवैध दारू आणि अन्य अंमली पदार्थ पकडण्यात आलेत. तामिळनाडूत सर्वाधिक रोकड जप्त करण्यात आली. मतदारांना वाटण्यासाठी ही रक्कम नेण्यात येत असल्याचा संशय आहे.  तामिळनाडूतून तब्बल १०७ कोटी २४ लाख रूपये पकडण्यात आहे. त्याखालोखाल उत्तरप्रदेशचा नंबर आहे. तिसऱ्या स्थानावर पंजाब आहे. महाराष्ट्रातून आत्तापर्यंत १९ कोटी ११ लाख रूपये पकडण्यात आलेत. १० मार्चला निवडणुका जाहीर झाल्यावर २५ मार्चपर्यंत म्हणजे अवघ्या १५ दिवसांत ५४० कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशमध्ये ८ कोटी २६ लाख रुपयांची रोख रक्कम पकडण्यात आली आहे. तर २२ कोटी ५५  लाख रुपयांची ८ लाख लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक किंमतीचे सोने चांदी जप्त करण्यात आले आहे. त्यांची किंमत तब्बल ५९ कोटी चार लाख रुपये इतकी आहे.


आंध्र प्रदेशमध्ये ५५ कोटी रुपयांची रोख रक्कम पकडली असून १२ कोटींची दारू जप्त करण्यात आली आहे. तर ३० कोटींचे सोने चांदी पकडण्यात आले आहे. आंध्र प्रदेशमध्ये एकूण १०३  कोटी ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


महाराष्ट्रात एकूण १९ कोटी ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात पाच कोटी ९० लाख रुपयांची रूख रक्कम, ९.१७ कोटी किंमतीची दारू, ३.११ कोटींचे अंमली पदार्थांचा समावेश आहे. पंजाबमध्ये सर्वाधिक किंमतीचे अंमली पदार्थ पकडण्यात आला. त्याची किंमत ८४.३० कोटी इतकी आहे.