सुलतानपूर : मुस्लिम समाजाला उद्देशून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री आणि सुलतानपूरच्या भाजपा उमेदवार मनेका गांधी या पुन्हा एका वादात अडकल्या आहेत. जिथून जास्त मतं तिथे जास्त विकास असा अजब फॉर्म्युला केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी मांडला आहे. गावांसाठी मनेका गांधी यांनी ए, बी, सी, डी असे गट तयार केल्याचे सांगितले. जिथून जास्त मते मिळतील तिथे जास्त विकास मिळेल अशी धमकीच गांधी यांनी दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मनेका गांधी यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


काही दिवसांपुर्वीच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये मुस्लिमांना मतदानानंतर माझी गरज लागेल. म्हणून माझ्या बाजूने मतदान करा' असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर देशभरातून त्यांच्यावर चांगलीच टीका झाली. दरम्यान निवडणूक आयोगाने दिलेल्या नोटीसला मनेका यांनी उत्तर दिले आहे. माझे वक्तव्य तोडमोड करून दाखवल्याचे त्यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. 


मनेका गांधी यांचा हा वादगस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मनेका यांनी मुस्लिमांना मैत्रीचा हात दिला. त्या म्हणाल्या, परतून काही मिळत नसेल, तर नेहमीच देणारा देऊ शकत नाही. मी निवडणूक जिंकणार आहे, पण मुस्लिमांशिवाय विजय बरा वाटणार नाही. मुस्लिम कामासाठी माझ्याकडे आले, तर मी विचार करेन की यांची कामे करून काय फरक पडणार आहे? परतून काहीही न मिळता देत राहायला आम्ही काही महात्मा गांधींची मुलं नाही. मी तुम्हाला मैत्रीचा हात पुढे करत आहे. माझ्या कामगिरीविषयी आपण पिलभित मतदारसंघात विचारु शकता. मी तेथून निवडणूक जिंकली आहे. बाकी तुमच्या हातात आहे.